आजी-माजी आमदार समोरासमोर, नांदगावमध्ये चौरंगी लढतीने आली रंगत
Maharashtra Assembly Election 2024 : सुरुवातीला काँग्रेस, नंतर शिवसेना, मध्यंतरी राष्ट्रवादी, कम्युनिष्ट पक्ष व आता पुन्हा शिवसेना... अशा सर्वच पक्षाला न्याय देणाऱ्या नांदगाव मतदारसंघात यंदा चौरंगी लढत होत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून आ. सुहास कांदे, शिवसेना ठाकरे गटाकडून गणेश धात्रक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा राजीनामा देऊन अपक्ष लढणारे समीर भुजबळ, मराठा समाजाचे डॉ. रोहन बोरसे यांच्यासह 14 उमेदवार यावेळी रिंगणात आहेत. सर्वच उमेदवारांनी जय्यत तयारी केलेली असल्याने या निवडणुकीत रंगत आली आहे.
विकासाच्या मुद्यावर आली निवडणूक
ही निवडणूक कायम नांदगावच्या पाणीप्रश्नावर लढली जायची. यावेळी विद्यमान आमदार हे विकासाच्या मुद्यावर रिंगणात आहेत. आ. कांदे यांनी करंजवण पाणी योजना मंजूर करून मनमाडचा 60 वर्षांपासूनचा प्रलंबित पाणी प्रश्न सोडविण्याचा दावा केला आहे. तसेच नांदगावसाठी 72 खेडी योजना, औद्योगिक वसाहतीसाठी निधी आणल्याचा दावा केला त्यांनी केला आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे धात्रक यांनीही हा पाणीप्रश्न आपल्या पाठपुराव्यामुळेच सुटल्याचे सांगताहेत. अपक्ष समीर भुजबळ व मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या पाठींब्यासाठी इच्छुक असणारे मराठा समाजाचे नेते डॉ. रोहन बोरसेही विकासाचा दावा सांगत आहेत.

लोकसभेला काय झाले होते
लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात महाविकास आघाडीची हवा होती. मात्र तरीही आ. कांदे यांनी महायुतीच्या डॉ. भारती पवार यांना 40 हजारांची आघाडी दिली होती. वास्तविक, त्यावेळी मनमाडमध्ये शरद पवारांची सभा झाली नसती तर ही आघाडी अजून वाढली असती, असे आ. कांदे समर्थक सांगतात. लोकसभेला महायुतीला आघाडी मिळालेली असल्याने व कोट्यवधींची विकासाकामे केलेली असल्याने या निवडणुकीत आ. कांदेच विजयी होतील, असे त्यांचे समर्थक म्हणताहेत.
विरोधकांनीही लावलाय जोर
या मतदारसंघात सुमारे लाखभर मराठा मतदार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना मानणारे अनेक कार्यकर्ते येथे आहेत. जरांगे पाटील यांच्या पाठींब्यासाठी अपक्ष उमेदवार डॉ. रोहन बोरसे यांनी प्रयत्न केले. मात्र जरांगे पाटलांनी कुणालाच पाठींबा न दिल्याने बोरसे समर्थक काहीसे निराश झाले. अपक्ष उमेदवार समीर भुजबळही येथे दोन वेळा आमदार होते. गेल्यावेळी त्यांचा आ. कांदे यांनी पराभव केलाय. याच पराभवाचा बदला घेण्यासाठी भुजबळ यावेळी फुल्ल तयारीत उतरले आहेत. उमेदवारीसाठी त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामाही दिला आहे.
काय आहेत प्रचाराचे मुद्दे
पिण्यासाठी, सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या अजूनही नांदगावमध्ये आहे. औद्योगिक वसाहत नसल्याने बेरोजगारी कायम प्रश्नही मोठा आहे. गोदावरी एक्स्प्रेसचा प्रश्न तसेच दुष्काळमुक्तीसाठी ठोस प्रयत्नांची गरज असल्याचे जाणकार सांगतात. यंदाच्या निवडणुकीत हेच मुद्दे गाजत आहेत. यावेळी नांदगाव मतदारसंघात तीन लाख 43 हजार 056 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महिलांची संख्याही 1 लाख 63 हजार 803 आहे. महिला मतदारही यावेळी निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले जातेय.












Click it and Unblock the Notifications