सहकार आणि उद्योगातील अग्रणी ; तानाजी सावंत धडाकेबाज आणि आक्रमक म्हणून ख्याती
Maharashtra Assembly Election 2024 : तानाजी सावंत हे नाव माहित नाही असा माणूस मराठवाड्यात शोधूनही सापडणार नाही. शेतकरी कुटुंबातला जन्म, अभियांत्रिकीचे शिक्षण, प्राध्यापकी, शिक्षण संस्था आणि साखर कारखान्यांची उभारणी, राजकारणात प्रवेश, आणि मंत्रिपद, धडाकेबाज स्वभाव, थेट भेटण्याची वृत्ती अशा अनेक बाबींमुळे तानाजी सावंत हे नाव सर्वतोमुखी झाले. सोलापूर, धाराशिव आणि पुणे पट्ट्यात तानाजी सावंत हे नाव सध्या खूपच लोकप्रिय आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात तानाजी सावंत यांचा जन्म झाला. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी सावंत यांनी मिळविली. सुरुवातीचा काही काळ प्राध्यापकि केल्यानंतर आणि पीएचडीचा अभ्यास केल्यानंतर ते उद्योग क्षेत्रात आले. धाराशिव जिल्ह्यात सोनारी येथे भैरवनाथ साखर कारखान्याची निर्मिती केली. आणि हळूहळू या कारखान्याचा त्यांनी विस्तार केला. आज भैरवनाथ साखर कारखान्याची अनेक युनिट अनेक जिल्ह्यात कार्यरत आहेत आणि त्या माध्यमातून तानाजी सावंत नावाची एक ताकद महाराष्ट्रात उभी राहिली आहे. पुणे येथे उभारण्यात आलेली जयवंत शिक्षण प्रसारक संस्था शेकडो मुलांना अध्यापनाचे कार्य करीत आहे. धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावलेला तेरणा साखर कारखाना देखील तानाजी सावंत यांच्याच समूहाने घेतला आहे.

सोलापुरात जन्म आणि धाराशिव ही कर्मभूमी
तानाजी सावंत यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात झालेला असला तरी त्यांनी धाराशिव जिल्ह्याला आपली राजकीय कर्मभूमी बनविली. राष्ट्रवादीचे बाहुबली नेते पद्मसिंह पाटील यांना टक्कर देणारा कोणी नेता जिल्ह्याच्या राजकारणात नव्हता तेव्हा ती जबाबदारी तानाजी सावंत यांनी स्वतःवर घेतली. धाराशिव जिल्ह्यात त्यासाठी संघटन उभारले. 2016 साली त्यांचा विधान परिषदेत प्रवेश झाला आणि काही काळ ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जलसंधारण मंत्री म्हणून कार्यरत होते.
राजकीय कारकीर्दीत त्यांनी सर्व पक्ष्यांशी मैत्रीचे आणि सलोख्याचे संबंध ठेवले. 2019 साली परंडा विधानसभा मतदारसंघातून तानाजी सावंत शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले. संघटनेला वेळोवेळी ताकद पुरविल्यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी तानाजी सावंत यांची अपेक्षा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी ती अपेक्षा पूर्ण होऊ दिली नाही. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन करून स्वतः मुख्यमंत्रीपद आणि मुलाला कॅबिनेट मंत्रीपद दिले आणि तानाजी सावंत दुखावले गेले.
एकनाथ शिंदे यांना साथ
2022 साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे उलटफेर केला त्यात तानाजी सावंत यांनी शिंदे यांना समर्थ साथ दिली. शिंदे यांच्यासोबत जे अनेक मोहरे सुरुवातीला फुटले त्यात तानाजी सावंत यांचे स्थान वरचे होते. पुढे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना पक्ष चिन्हसकट शिंदे यांच्या ताब्यात आला.एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून तानाजी सावंत यांना नियुक्त करण्यात आले. आक्रमक आणि धडाडीचा मंत्री म्हणून तानाजी सावंत यांनी आपल्या लौकिक प्रस्थापित केला. माध्यमांनी तानाजी सावंत यांना वारंवार खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला पण सावंत यांनीही समर्पक उत्तरे देऊन विरोधकांना गप्प बसवले.
जल सिंचनाला प्राधान्य
सोलापूर आणि धाराशिव हे दोन्ही जिल्हे पाण्याच्या बाबतीत काहीसे कमनशीबी आहेत. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रप्रमाणे या दोन जिल्ह्यांची प्रगती होऊ शकली नाही. आपल्या कार्यक्षेत्रात पाण्याचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन तानाजी सावंत यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजना कार्यान्वित केली. या योजनेचा 250 हून अधिक खेड्यांना लाभ झाला. या माध्यमातून सातशे किलोमीटर काम पूर्ण झाले असून पाण्याची साठवण क्षमता चार टीएमसीने वाढली आहे तसेच भूजल पातळी देखील बारा टीएमसी पेक्षा अधिक वाढली आहे. कृष्णा मराठवाडा उपसा जलसिंचन योजनेसाठी 11 हजार 723 कोटी रुपयांचा निधी खेचून आपल्या परिसराला 7 टीएमसी पाण्याची उपलब्धता होईल याची दक्षता देखील तानाजी सावंत यांनीच घेतली.
20 हजार महिलांना रोजगार
महिला सक्षमीकरणासाठी आणि महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून क्रांती महिला उद्योग समूहाची स्थापना करण्यात आली.गृहोपयोगी वस्तू, अन्नपदार्थ आणि सजावटीच्या वस्तूंचा व्यवसाय या माध्यमातून केला जातो. या उद्योग समूहाच्या माध्यमातून वीस हजार हून अधिक महिलांना रोजगाराची संधी प्राप्त झाली असून लाखो रुपयांची उलाढाल या उद्योग समूहाच्या माध्यमातून करण्यात येत आहे, तसेच तानाजी सावंत यांनी स्वखर्चाने भूम, परांडा आणि वाशी तालुक्यात 120 डिजिटल बोर्ड देऊ केले आहेत. या डिजिटल बोर्डाचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण 400 हून अधिक शिक्षकांना देण्यात आले आहे.
पुन्हा संधी
परांडा तालुक्यात शेती आणि जलसिंचन क्षेत्रात आणि सहकार क्षेत्रातही तानाजी सावंत यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्या उद्योग समूहाच्या माध्यमातून आणि शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. विकासाच्या बाबतीत तानाजी सावंत यांची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिलेली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तानाजी सावंत यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीत देखील तानाजी सावंत बाजी मारतील आणि त्यांच्या माध्यमातून सुरू असलेली विकासाची कामे अखंडपणाने सुरू राहतील अशी राजकीय हवा सध्या धाराशिव जिल्ह्यात आहे.












Click it and Unblock the Notifications