सरकारच्या विरोधात 1 सप्टेंबरला महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन- उध्दव ठाकरे
मुंबई : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळला कोसळल्यानंतर आता राज्याचं राजकारण चांगलचं तापलं आहे.मालवणमध्ये आज महाविकासआघाडीकडून सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी राजकोट किल्यावर महाविकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर किल्यावर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्रात एकप्रकारची अस्वस्थता आहे. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. भ्रष्टाचार वाढत आहे. त्यातच सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. महायुतीला जेवढी इंजिन लावले, तेवढा भ्रष्टाचार वाढत आहे. आज मालवण येथील राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीकडून पाहणी दौरा आणि त्यानंतर निषेध आंदोलन घेण्यात आले आहे. मात्र तिथे शिवद्रोही लोक आडवे आले. महाराष्ट्र या शिवद्रोह्यांना धडा शिकवेल. "

1 सप्टेंबरला महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन
1 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता हुतात्मा स्मारकाला वंदन करून गेट वे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन केले जाणार आहे. महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष यात सहभागी असणार असून राज्यातील शिवप्रेमींनी यात सामील व्हावे", असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
सरकारबद्दल जनतेच्या मनात चीड
पुतळ्याची जबाबदारी ही पूर्णपणे राज्य सरकारची आहे. ते नाकारू शकतं नाही. पुतळ्याच्या उद्घाटनासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी तसेच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्या ठिकाणी होते. त्यामुळे जबाबदारी राज्य सरकारची आहे. एका भगिनीला त्रास देण्यात आला होता, त्यावेळीं शिवाजी महाराजांनी त्याचे हात कलम करण्याचे आदेश दिले होते.
आम्ही कुठल्याही प्रकारचे राजकरण करतं नाही. कुणी सांगत आहे की, वाऱ्याचा वेग जास्त होता त्यामुळें पुतळा पडला. त्या ठिकाणी भ्रष्टाचार किती टोकाला पोहोचला आहे. कुठे भ्रष्टाचाराची भूमिका घेऊ नये याचं तारतम्यही यांना नाही. ज्या ठिकाणी पंतप्रधान ज्या ठिकाणी गेले त्याठिकाणी किती मोठया प्रमाणात भ्रष्टाचार खोलवर गेला आहे. या सरकारबद्दल जनतेच्या मनात चीड आहे, असं पवार यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications