'जरांगेंचा मोर्चा सरकार पुरस्कृत, पर सभेसाठी आमदार देतात 15 लाख': 'या' ओबीसी नेत्याने केला दावा!
Laxman Hake VS Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये सुरू असलेल्या वादाने आता अधिक गंभीर स्वरूप धारण केले आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंना आमदार पैसे देत असून त्यांचा मोर्चा सरकार पुरस्कृत असल्याचा दावा हाके यांनी केला आहे.
जरांगेंच्या बैठकांवर 'फंडिंग'चा आरोप
अकोला येथे माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. जरांगे यांचा मोर्चा हा 'सरकार पुरस्कृत' आहे. हाके यांच्या मते, मनोज जरांगे यांच्या मतदारसंघातील एका बैठकीसाठी आमदार त्यांना १० ते १५ लाख रुपये देतात. बीड जिल्ह्यातील मांजरसुंभ्यात नुकत्याच झालेल्या जरांगे पाटील यांच्या निर्णायक बैठकीसह इतर बैठकाही याच 'फंडिंग'वर आधारित असल्याचा आरोप हाके यांनी केला. याच कारणामुळे मराठवाड्यातल्या छोट्या छोट्या गावांतही जरांगे यांची मोठमोठी बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्यात आली आहेत, असे हाके म्हणाले.

आरक्षणाच्या माध्यमातून 'व्यवस्था हातात घेण्याचा' प्रयत्न
लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणामागे राजकीय आणि प्रशासकीय उद्देश असल्याचा गंभीर आरोप केला. आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला 'ही व्यवस्था हाती घ्यायची आहे'. ओबीसीमध्ये आरक्षण घेऊन 'नोकरशाहीत आपले लोक घुसवण्याचा' त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप हाके यांनी केला. महाराष्ट्रातील नेतृत्वाकडून आता कोणतीच अपेक्षा नसल्याचे सांगत, यासंदर्भात केंद्रातील ओबीसी नेत्यांना साकडे घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमोल मिटकरींवर बोचरी टीका
यावेळी लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर पुन्हा एकदा बोचरी आणि खालच्या पातळीवर टीका केली. "मिटकरी हे फार मोठे व्यक्ती नाहीत. अमोल मिटकरी हे अजित पवारांनी विरोधकांवर भुंकण्यासाठी ठेवलेला कुत्रा आहे," अशा शब्दात हाकेंनी प्रहार केला. मिटकरी बिग बॉसच्या घरात चार-पाच ताससुद्धा टिकणार नाहीत, असा चिमटा त्यांनी काढला.
मिटकरींना भविष्यात काम उरणार नाही, यासाठी महाराष्ट्रातील काही तमाशा मंडळांना आपण त्यांच्यासाठी सोंगाड्या किंवा ढोलकीवाला म्हणून काम देण्याची विनंती करणार असल्याचा टोला हाकेंनी लगावला.
२९ ऑगस्टला मुंबईत निर्णायक आंदोलन
या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमी असली तरी दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे मोठे आंदोलन मुंबईत होणार आहे. तारीख आणि ठिकाण: येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत हे आंदोलन सुरू होणार आहे. त्यासाठी जरांगे यांनी नुकताच बीडमधून एल्गार केला. जरांगे यांनी पुन्हा एकदा निर्धार व्यक्त केला आहे की, 'मुंबईत येणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही.'
जरांगे पाटील यांच्या काय आहेत मागण्या?
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जावी, सातारा आणि हैदराबादचे गॅझेट लागू करावे आणि ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना त्वरित प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी.












Click it and Unblock the Notifications