'लाडक्या बहिणीं'च्या साड्या पडून?, अंत्योदय कार्डधारक महिला का घेत नाहीत साड्या?, नेमकं कारणं काय
Ladki Bahini Yojana News : राज्य शासनाने होळी सणानिमित्त अंत्योदय गटातील 'लाडक्या बहिणीं'ना साड्याचे गिफ्ट देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सरकारी गोदामात होळीपूर्वीच साड्या दाखल झाल्या.
त्यानंतर मार्चमध्ये साड्यांचे वाटपही सुरू झाले. परंतु, होळी आटोपून एप्रिल महिना अर्धा संपल्यानंतर सुद्धा प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थी महिलांनी या साड्यांचा लाभ घेतला नाही. अजूनही या साड्या गोदामामध्ये पडून आहेत. महिलांनी या योनजेकडे का पाठ फिरवली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्याचा जरी विचार केला तर 11 एप्रिल पर्यंत एकूण पात्र लाभार्थी 45 हजारापैकी केवळ 25 हजार लाभार्थी महिलांनाच साड्यांचे वाटप करण्यात आले आहे, तर सुमारे 20 हजार 264 लाभार्थी महिलांना अद्यापही साड्यांचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे साड्यांचे वाटप अतिशय संथगतीने सुरू आहे, तर अनेक लाडक्या बहीणींनी या योजनेकडे पाठ फिरवली असल्याची चर्चा आता सुरू झाली.

राज्यसरकारने काय केली होती घोषणा?
राज्य सरकारने अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशनच्या साड्या वाटप करण्याचे जाहीर केले होते. गेल्यावर्षीही ही योजना राबवण्यात आली होती. यावर्षीही होळी सणानिमित्त साडी वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील महिलांना स्वस्त धान्य दुकानांमधून एक साडी मोफत देण्यात येत आहे.
कार्डधारकांना साड्यांचे वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील गोदामात फेब्रुवारीच्या शेवटी साड्या दाखल झाल्या. परंतु साड्यांचे वाटप मार्चमध्ये सुरू झाले. परंतु होळी 13 मार्च रोजी व धुलीवंदन 14 मार्च रोजी आटोपल्यानंतरही अद्याप 20 हजार लाभार्थी महिलांना साड्यांचे वाटप झाले नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांना साड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
लाभार्थी महिलांना प्रतीक्षा की फिरवली योजनेकडे पाठ
या योजनेअंतर्गत साड्यांचे वितरण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन ते होळी दरम्यान करण्याबाबत शासनाने निश्चित केले होते.
त्यानुसार राज्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील रास्तभाव दुकानापर्यंत विहित वेळेत साड्या पोहोचतील याची दक्षता घेण्याबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाद्वारे यंत्रमाग महामंडळास सांगितले गेले होते.
त्यानुसार महामंडळाकडून राज्यातील गोदामापर्यंत साड्यांचा पुरवठा करण्यात आला. परंतु साड्यांचे वाटप मात्र उशीराने सुरू झाल्याने अद्याप पूर्ण वाटप होणे बाकी आहे. तर वेळेत योजनेचा लाभ न मिळाल्याने अनेक महिलांनी या योजनेकडे पाठ देखील फिरवली आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यातच ही परिस्थिती नाही तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती असल्याचे समोर आले आहे.












Click it and Unblock the Notifications