नवख्या राहुल पाटलांना अनुभवी नरकेंचे आव्हान झेपेल का..? पहा, करवीर मतदारसंघाचे गणित
Karveer Assembly Election Rahul Patil vs Chandradeep Narke : कोल्हापूर तालुक्यातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून करवीर मतदारसंघाकडे पाहिले जाते. या विधानसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेसकडून राहुल पाटील यांच्या विरोधात शिवसेना एकनाथ गटाचे चंद्रदीप नरके यांच्यात लढत होणार आहे. या मतदारसंघात गगनबावडा, पन्हाळा व करवीर असे तीन तालुके येतात. या तिन्ही तालुक्यांतील सुमारे 275 गावांच्या या मतदारसंघात यावेळी कशी लढत होईल ते आपण पाहू...
मतदारसंघात शिवसेनेची चलती
कोल्हापूरचे राजकारण हे पक्षापेक्षा गटा-तटावर चालते असे म्हणतात. या जिल्ह्यात पीएन पाटील गट, बंटी पाटील गट, मुश्रीफ गट, महाडीक गट, कोरे गट, माने गट, नरके गट अशा गटांत कार्यकर्ते विभागले गेले आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघावर यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते. मात्र त्यानंतर नरके यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत हा सेनेचा बालेकिल्ला बनलला. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे पी. एन. पाटील यांच्याकडून नरके यांचा पराभव झाल्यानंतर या मतदारसंघावर काँग्रेसने झेंडा फडकवला. मात्र लोकसभा निवडणुकीदरम्यान पी. एन. पाटील यांचे निधन झाले आणि त्यांचे पुत्र राहुल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. राहुल पाटील यांची ही पहिलीच निवडणूक आहे. मात्र नरके यांना तीन निवडणुकांचा अनुभव असल्याने त्याचेच पारडे येथे जड मानले जात आहे.

महाडिक गट नरके यांच्या प्रचारात
या तालुक्याचे राजकारण हे साखर कारखानदारीभोवती फिरते. कुंभी कारखाना हा चंद्रदीप नरके यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. शिवाय महाडिक गटही नरके यांच्या बाजूने असल्याने नरके यांचे बळ वाढले आहे. आ. विनय कोरे यांचा पन्हाळा तालुक्यात प्रभाव आहे. पन्हाळा तालुक्यातली 68 गावे करवीर विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत. त्यामुळे ऐनवेळी महायुतीचा मित्रपक्ष म्हणून कोरे गटही नरके यांना साथ देण्याची शक्यता आहे.
नरके यांना मोठ्या नेत्यांची साथ
कॉंग्रेसचे नेते पी.एन.पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे पूत्र राहुल पाटील यांना सुहानुभूती मिळेल, असे काहींना वाटते. मात्र राहुल पाटील यांची ही पहिलीच निवडणूक असल्याने ते कार्यकर्त्यांना कसे सांभाळतात, यावर विजयाची गणिते अवलंबून असणार आहेत. त्याऊलट शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांची ताकद महत्वाची ठरणार आहे. नरके यांना विरोधी गटातील अनेक कार्यकर्ते फोडण्यात यश मिळाल्याने त्यांचा लाभ कसा मिळणार, यावर या लढतीचे भवितव्य अवलंबून आहे. महायुतीच्या सरकारमुळे नरके यांनी विकासकामे आणि जनसंपर्काच्या जोरावर जाहीरातबाजी करीत मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती केलेली आहे.
नरकेंनी आणला 100 कोटींचा निधी
29 ऑक्टोंबरला चंद्रदीप नरके यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी सुमारे 20 हजार कार्यकर्ते शक्तीप्रदर्शनासाठी उपस्थित होते. अर्ज भरण्यासाठी नरके यांची रॅली निघाल्यानंतर खानविलकर पेट्रोल पंप ते रमणमाळ चौक हा रस्ता भगवामय झाला होता. या कार्यक्रमात नरके यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करवीरला 100 कोटींचा निधी दिल्याचा उल्लेख केला. शिवाय गेल्या पाच वर्षात महायुतीच्या सर्व योजनांचा लाभ घराघरात पोहचल्या आहेत, असं त्यांनी सांगितले. करवीर मतदारसंघात भाजप, अजित दादा गट व शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्यात नरके यांना यश आल्याने नवखे राहुल पाटील त्यांच्यासमोर टिकतील का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.












Click it and Unblock the Notifications