मुश्रीफच कागलचे वस्ताद ; शरद पवार गटाचे समरजीत घाटगे पराभूत
Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समरजीत घाटगे यांच्या थेट लढतीमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात अखेरीस हसन मुश्रीफ यांनीच बाजी मारून मतदारसंघावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.
हसन मुश्रीफ हे गेल्या अनेक वर्षापासून कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. समरजीत घाटगे यांच्या रूपाने त्यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले होते. 2019 साली समरजीत घाटगे यांनी अपक्ष म्हणून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात दंड थोपटले होते. मात्र त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता. 2019 साली महाराष्ट्राच्या राजकारणात जो उलटफेर झाला त्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री झाले आणि महाराष्ट्राच्या जनतेने नाकारलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आली. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मुश्रीफ हे मंत्री होते तर समरजीत घाटगे हे कोल्हापूर भाजपमध्ये कार्यरत होते.

2022 साली राज्यात पुन्हा उलटफेर झाला आणि शिवसेनेच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले एकनाथ शिंदे आपल्या चाळीस आमदारांसह निघून गेले. आठ मंत्र्यांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. भाजपच्या पाठींब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. 2023 साली अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह युती सरकारमध्ये सहभागी झाले. या घडामोडींमुळे समरजीत घाटगे यांची कोंडी होणे स्वाभाविक होते.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीचे शाहू महाराज यांच्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात थेट लढत झाली. या निवडणुकीत समरजीत घाडगे यांच्या गटाने महायुतीचे फारसे काम केले नसल्याचे मंडलिक गटाचे म्हणणे होते. भाजप कार्यरत असलेले आणि देवेंद्र फडणवीस यांचे लाडके समरजीत घाटगे कोणत्याही क्षणी अन्य पर्याय निवडतील अशी अटकळ तेव्हापासून बांधली जात होती. मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार तो मतदार संघ त्या पक्षाला सोडायचा हे महायुतीचे सूत्र होते त्यामुळे समरजीत घाटगे यांना कागल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणे जवळपास अशक्य होते. हे ओळखून समरजीत यांनी शरद पवार यांची तुतारी हाती घेतली. खुद्द शरद पवार यांनी कागल येथे झालेल्या भव्य मेळाव्यात समरजीत यांचे स्वागत केले. समरजीत यांना रोखण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी आटोकाट प्रयत्न केला. पण समरजीत बधले नाहीत. अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करायचे असा चंग शरद पवार यांनी बांधला होता. समरजीत घाटगे यांच्या रूपाने शरद पवार यांना चांगला मोहरा मिळाला. परंतु कागलच्या मैदानात अखेरीस मुश्रीफ यांनीच बाजी मारली.












Click it and Unblock the Notifications