सरकारची शिष्टाई कामाला, लक्ष्मण हाकेंच उपोषण अखेर स्थगित;मनोज जरांगेंवर जोरदार प्रहार
Mumbai: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या भेटीला आज शनिवारी सरकारचे शिष्टमंडळ पोहोचले. या शिष्टमंडळात ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर ४ मंत्री होते. तसेच इतर 12 जणांचा समावेश या शिष्यमंडळात आहे.
यावेळी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही असे आश्वासन सरकारच्या वतीने शिष्टमंडळाने दिले. ठराविक एक दोन मागण्या सोडल्या तर इतर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाकडून देण्यात आले. सरकारच्या या आश्वासनानंतर हाके यांनी त्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.

उपोषणाचा दहावा दिवस
दरम्यान, मागील दहा दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले होते. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी हाके आणि ओबीसी आंदोलकांकडून करण्यात येत होती. लक्ष्मण हाकेंच्या प्रकृतीवर परिणाम होत असतानाच आज (शनिवारी) सरकारमधील मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, गुलाबराव पाटील, उदय सामंत यांच्यासह धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर हे हाके यांच्या भेटीसाठी वडीगोद्रीमध्ये दाखल झाले होते. शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पित हाके यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही - भुजबळ
हाके यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर ओबीसी नेते तथा मंंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, ''आम्ही कोणालाही धमक्या देत नाही. जमाना जानता हैं हम किसीके बाप से नहीं डरते अशा शब्दात त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. पुढे ते म्हणाले, आपल्याला या दोघांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. लढण्यासाठी दोन्ही वाघ पुन्हा मैदानात पाहिजे आहेत. आमच्या ताटातले आम्हाला राहू द्या. मराठा समाजाला तुम्ही वेगळे आरक्षण द्या असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
आंदोलन थांबवले नाही तर स्थगित केले
दरम्यान, उपोषण सोडल्यानंतर लक्ष्मण हाके म्हणाले की, बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन सरकारने आम्हाला दिले आहे. मात्र आम्ही आंदोलन थांबवले नसून स्थगित केले आहे. आमच्या दोन मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. आम्ही आक्षेप घेतलेल्या हरकतींची श्वेतपत्रिका काढावी. तसेच सगे सोयऱ्यांचे आरक्षण देणार नाही असे आश्वासन सरकारने दिले आहे. मात्र वेळोवेळी आंदोलनाची दिशा ठरवत राहू'', असे हाके म्हणाले.
ओबीसी नेत्यांना टार्गेट केले
हाके यांनी यावेळी पंकजा मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवावरही भाष्य केले. ते म्हणाले, दहा दिवस झाले तरी इकडे कोणी फिरकले नाही याचे दुःख आहे.

ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचे काम केले जात आहे. पंकजा मुंडे यांना ठरवून पाडण्याचे काम करण्यात आले आहे. समाजाच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला ताकद मिळाली'', असे हाके म्हणाले.












Click it and Unblock the Notifications