धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही; मनोज जरांगे पाटील आक्रमक, वाचा नेमकं काय झालंय...
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज परभणीत मोर्चा काढण्यात आला होता. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, आ. संदीप क्षीरसागर, आ. सुरेश धस यांच्यासह अनेक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, आज पुण्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली. त्यामुळे या मोर्चात मनोज जरांगे काय बोलणार, याकडे लक्ष लागले होते.

काय म्हणाले जरांगे पाटील?
मोर्चेकऱ्यांसमोर बोलताना जरांगे पाटील यांनी अनेक आरोप केले. ते म्हणाले, वाल्मिक कराड पोलिसांना पुण्यात सापडतो. आता इतर दोन आरोपीही पुण्यात सापडतात. आरोपींना पुण्यात कोण सांभाळतं..? सरकार किंवा त्यांचे कुणी मंत्री या आरोपींना मदत करत होते का, हे पोलिसांनी तपासायला हवे. हे प्रकरण दाबण्याचा कुणी प्रयत्न करु नका. ते दबणार नाही. जोपर्यंत आरोपींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
मुंडे यांनाही इशारा
जरांगे पाटील पुढे म्हणाले, माणसाच्या हत्या मला सहन होणार नाही. एकही आरोपी बाहेर आला तर त्याला सोडणार नाही. मंत्री धनंजय मुंडे या प्रकरणात सापडले तर त्यांनाही रस्त्यावर फिरु देणार नाही. देशमुख कुटुंबाला कुणी त्रास दिला तर मुंडेंना बीडमध्येच येऊ देणार नाही. या प्रकरणात जो कोणी आरोपी असेल, त्या प्रत्येकाला शिक्षा व्हावी. आरोपींची नार्को टेस्ट केली तर, किमान ५०-६० आरोपी समोर येतील, असा दावाही जरांगे यांनी केला.
जातीयवाद नाही का?
जरांगे पाटील यांनी बीडमधील जातीयवादालाही हात घातला. ते म्हणाले, आम्ही आमचं न्याय हक्कासाठी आरक्षण मागितलं तर आम्ही जातीयवादी झालो. मग संतोष देशमुखांना क्रुरपणे मारलं, तो जातीयवाद नव्हता का? असा सवाल त्यांनी विचारला. ते म्हणाले, आमचे लोक मारुन तुमचे आरोपी लपून ठेवता, हे काय आहे? यापुढे जर हल्ला झाला तर जशास तसे उत्तर देऊ. संतोष देशमुखांना न्याय मिळाल्याशिवाय मागे हटायचं नाही, असंही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications