अमरावतीच्या MIDC तील कंपनीत विषबाधा; शेकडो कामगार रुग्णालयात दाखल, उलट्यांचा त्रास सुरु
अमरावती येथील नांदगाव पेठ एमआयडीसीतील गोल्डन फायबर कंपनीतील कामगारांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. या कामगारांना नेमकी अन्नातून की पाण्यातून विषबाधा झाली, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून, आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

गोल्डन कंपनीत विषबाधा
आज दुपारी गोल्डन फायबर कंपनीतील सुमारे १०० पेक्षा अधिक कामगारांना अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागला. एकाचवेळी एवढ्या मोठ्या कामगारांना हा त्रास होऊ लागल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर तातडीने या कामगारांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या कामगारांना अन्नातून विषबाधा झाली की कंपनीतील पाण्यातून विषबाधा झाली, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. विषबाधा झालेल्या कामगारांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
कामगारांवर उपचार सुरु
या कंपनीत एकाच वेळी १०० पेक्षा जास्त कामगारांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर त्या सर्व कामगारांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हालविण्यात आले. त्यांच्यावर आता उपचार सुरु आहे. मात्र ही विषबाधा कशामुळे झाली, याचा तपास सुरु आहे. यापैकी बरेच रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे सांगण्यात येते. आरोग्य विभागाचे पथक सर्व रुग्णांवर उपचार करत असून विषबाधा कशामुळे झाली या प्रकाराचा तपास सध्या सुरु असल्याचे सांगितले जात आहे.
बिस्कीटात आळ्या
अमरावतीत कंपनीतील कामगारांना विषबाधा झाल्याची घटना घडण्यापूर्वी तेथेच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. नारायण कराडे यांच्या घरी बिस्कीटाच्या पुड्यात आळ्या निघण्याचा प्रकार उघडकीस आला. शहरातील डी मार्ट मधून खरेदी केलेल्या बिस्कीटातून आळ्या निघाल्यानंतर एकच खळबळ उडाली. नारायण कराडे यांनी या प्रकाराबाबत दोषी असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.












Click it and Unblock the Notifications