Today Gauri Avahan: आज घरोघरी महालक्ष्मीचे आगमन, जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् कसे होते गौराईचे स्वागत!
Gauri Avahan shubh muhurat : गणेश चतुर्थीनंतर येणारा गौरी (महालक्ष्मी) उत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. आज 31 ऑगस्ट २०२५ रोजी घरोघरी गौराईजे आगमन होणार आहे. हा तीन दिवस चालणारा सण आहे. या काळात घराघरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. भाद्रपद शुद्ध सप्तमीला गौरीचे आगमन होते आणि तीन दिवसांनी तिचे विसर्जन केले जाते.

गौरी आवाहन: कधी आणि शुभ मुहूर्त
२०२५ मध्ये, गौरी आवाहन ३१ ऑगस्ट रोजी म्हणजेच आज रविवार होत आहे. शुभ मुहूर्त: पहाटे ५:५९ ते संध्याकाळी ६:४३ पर्यंत गौरी आवाहन केले जाणार आहे. तर उद्या १ सप्टेंबर २०२५ (सोमवार) ज्येष्ठा गौरी पूजन केले जाईल. तर गौरी विसर्जन: २ सप्टेंबर २०२५ (मंगळवार) रोजी होईल.
गौरींना काही ठिकाणी महालक्ष्मी देखील म्हणतात. लोकपरंपरेनुसार, गौरी ही गणपतीची आई पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते. माहेरवाशीण असलेल्या गौरींचा पाहुणचार मोठ्या भक्तिभावाने केला जातो.
महालक्ष्मीचे स्वागत कसे केले जाते?
गौरी उत्सवाच्या तीन दिवसांत प्रत्येक दिवशी विशिष्ट पद्धतीने पूजा केली जाते.
१. गौरी आवाहन (पहिला दिवस - ३१ ऑगस्ट २०२५)
घरात गौरीचे स्वागत करताना, ज्या स्त्रीच्या हातात गौरी असतील, तिचे पाय दूध आणि पाण्याने धुवून त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढले जाते.
घराच्या उंबऱ्यापासून ते गौरी बसवण्याच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवत आणले जाते.
काही ठिकाणी, गौरींना घरात प्रवेश देण्याआधी, त्यांना घराची समृद्धी आणि दुधदुभत्याची जागा दाखवण्याची प्रथा आहे.
गौरींना साडी नेसवून, दागिने आणि मुखवटा घालून सजवले जाते.
या दिवशी संध्याकाळी गौरींना भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो.
२. ज्येष्ठा गौरी पूजा (दुसरा दिवस - १ सप्टेंबर २०२५)
या दिवशी गौरींची पूजा आणि आरती केली जाते. यासाठी पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे असे विविध पदार्थ बनवून केळीच्या पानावर नैवेद्य दाखवतात.
३. गौरी विसर्जन (तिसरा दिवस - २ सप्टेंबर २०२५)
या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडल्या जातात. या गाठींमध्ये हळदी-कुंकू, सुकामेवा, बेलफळ, रेशीम धागा अशा वस्तू टाकून त्या बांधल्या जातात.
गौरींची पूजा-आरती करून, गोड शेवयाची खीर आणि उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवला जातो.
गौरींचा पुढील वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण देऊन निरोप घेतला जातो आणि त्यांचे पाण्यात विसर्जन केले जाते.
विसर्जन करून परत येताना थोडी वाळू घरी आणून ती घरात सर्वत्र टाकतात, यामुळे घरात समृद्धी येते अशी लोकांची श्रद्धा आहे. तर बऱ्याच घरांमध्ये गौरीच्या मुखवटे सुरक्षित ठिकाणी ठेऊन दिले जातात.












Click it and Unblock the Notifications