Gadchiroli accident : भरधाव ट्रकनं 6 लेकरांना चिरडलं! 4 जण ठार, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दुःख
Gadchiroli accident : गडचिरोलीतील आरमोरी येथील रस्त्यावर भीषण अपघात घडला असून रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या सहा मुलांना भरधाव ट्रकने चिरडले. या गंभीर अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे ही घटना घडली असून या घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली.

गडचिरोलीत पहाटे पाच वाजताची दुर्दैवी घटना
गडचिरोलीत आज पहाटे पाच वाजता काटली गावाजवळ ही भीषण घटना घडली. पहाटे व्यायामासाठी ही मुलं गेली होती. यात पिंकू भोयर (वय १४), तन्मय मानकर(वय १६) यांचा जागीच मृत्यू झाला तर दिशा मेश्राम आणि तुषार मारबते यांचाही रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर एका अपघातात 4 युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 7, 2025
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेत 2 युवक जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य…
जखमींना हेलिकाॅप्टरने नागपूरकडे रवान केले
दरम्यान या भीषण अपघातानंतर दोन गंभीर जखमी मुलांना नागपूरला हेलिकाॅप्टरने नेण्यात आले. यामध्ये क्षितिज मेश्राम आणि आदित्य कोहपते अशी जखमींची नावे आहेत.
आरमोरीजवळ वाहतूक कोंडी
काटली गावाजवळील अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी रस्ता अडवत आपला संताप व्यक्त केला. यामुळे काही काळ गडचिरोली महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. यादरम्यान जमावाने आंदोलन केल्याचे वृत्त आहे.
मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांप्रती संवेदना व्यक्त करत त्यांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यंत्र्यांनी केली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करत म्हटले की, "गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर एका अपघातात 4 युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 2 युवक जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना नागपूर येथे पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून पुढच्या 1 तासात त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले. मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल."












Click it and Unblock the Notifications