अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- पोलिसांवर संशय घेणं अतिशय दुर्दैवी
Badlapur School Girl Rape Case : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला असून त्यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी निशाणा साधला.
बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्या संदर्भातील तपासासाठी पोलीस त्याला घेऊन जात होते. याच दरम्यान अक्षय शिंदे याने एपीआय निलेश मोरे यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये पोलीस अधिकारी निलेश मोरे हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तरा दाखल गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मला समजली आहे. या सर्व घटनेबाबत पोलीस तपासानंतर अधिक माहिती समोर येईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

एकीकडे फाशी द्या म्हणायचे अन् आता बाजू घ्यायची
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, 'बदलापूर प्रकरणातील आरोपीवर पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात पोलीस त्याला तळोजा कारागृहातून घेऊन येत असताना ही घटना घडली आहे. या दरम्यान त्याने पोलिसांवर गोळी झाडली. यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडली. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे. एपीआय मोरे यांच्यावर आरोपीने फायरिंग केली. पोलिसांनी बचावासाठी त्याच्यावर गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती आली आहे. ज्याने या लहान मुलींवर अन्याय केला. आधी विरोधक म्हणत होते की त्याला फाशी द्या. आता विरोधक त्याची बाजु घेत असतील तर ते निंदणीय आहे.
विरोधकांना बोलायचा अधिकार नाही
विरोधी पक्षाला विरोधात बोलायचा काहीही अधिकार आहे. पोलीस जखमी आहे एपीआय दर्जाचा त्याच्याबाबत विरोधकांना काहीही वाटत नाही का. जे पोलीस कायदा सुव्यस्था राखण्यासाठी काम करतात. उन्हात पावसात थंडी वाऱ्यात काम करतात. त्या पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं अशा वेळी विरोधकांनी असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे. या प्रकरणात चौकशी होईल आणि सत्य समोर येईल. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. बहीण योजनेनेने ते बिथरले आहेत. त्यामुळे ते उलटसुलट आरोप करत आहेत.
बदलापूर प्रकरण नेमकं काय आहे?
बदलापूर मधील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमूरड्या मुलींवर अक्षय शिंदे याने अत्याचार केल्याची घटना घडली होती. वैद्यकीय तपासणीनंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर दोन्ही मुलींच्या पालकांनी सुरुवातीला शाळा प्रशासन आणि नंतर पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. शाळा प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. तसेच पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करताना दिरंगाई केल्याचा आरोपही झाला होता. त्यानंतर बदलापूरमध्ये संताप व्यक्त केला गेला होता. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी बदलापुरात नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन केले होते. आंदोलकांनी जवळपास ९ तास मध्य रेल्वे वाहतूक बदलापूर रेल्वे स्थानकात रोखून धरली होती.












Click it and Unblock the Notifications