"महाविकास आघाडी नव्हे, महाकन्फ्यूज आघाडी"; ECकडे धाव घेण्यावरून शिंदेंचा विरोधकांना तिखट टोला
Eknath Shinde on MVA Mahaconfused Aghadi : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. 'डोळ्यापुढे पराभव दिसत असल्यानेच' महाविकास आघाडीने तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी आयोगाकडे धाव घेतली असून, ही आघाडी 'महाविकास आघाडी नव्हे, तर महाकन्फ्यूज आघाडी' आहे, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
नेमकं काय घडलं?
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांची भेट घेतली. आगामी निवडणुकांमध्ये लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अधिक बळकट व्हावा यासाठी पूर्ण पारदर्शकता बाळगण्याची विनंती या शिष्टमंडळाने आयोगाला केली होती. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांच्या शिष्टमंडळावर हल्ला चढवला.

"कुणाचा कुणाशी पायपोस नाही"
एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावावर बोट ठेवत टीका केली. ते म्हणाले की, "विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ आपल्या तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आले आहे. ही महाविकास आघाडी नाही, तर महाकन्फ्यूज आघाडी आहे. त्यांच्यात एवढे कन्फ्यूजन आहे की, कोण काय बोलते हे काहीच समजत नाही. कुणाचा कुणाशी पायपोस नाही. त्यामुळे हे कन्फ्यूज लोक एकत्र आले आहेत."
पायदळी सरकली वाळू: पराभवाची भीती
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांमुळे आणि जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे विरोधक हवालदिल झाले आहेत, असे शिंदे म्हणाले. महायुतीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील विजय मिळवल्यामुळे, आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जनता महायुतीच्या कामाला पोचपावती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"समोर पराभव दिसत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पराभव समोर दिसू लागतो, तेव्हा अशा प्रकारच्या तक्रारी माणसे सुरू करतात. त्यामुळे त्यांनी तशा तक्रारी सुरू केल्या आहेत."
शिंदेंचा आरोप: 'रडीचा डाव' खेळणे सुरू
महाविकास आघाडीच्या तक्रारींना 'रडीचा डाव' म्हणत एकनाथ शिंदे यांनी कठोर टीका केली. "मी एवढेच सांगेन की, जेव्हा - जेव्हा महाविकास आघाडीला विजय मिळाला, तेव्हा तेव्हा त्यांनी तक्रारींचा पाढा केव्हाच वाचला नाही. पण पराभव झाल्यानंतर मात्र त्यांनी हा पाढा वाचला. अगदी त्यांनी निवडणूक आयोग व न्यायालयासह सर्वांवरच आरोप केले."
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव दिसत असल्यामुळेच विरोधक आयोगाकडे आले आहेत. मात्र महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. ही जनता काम करणाऱ्या, विकास करणाऱ्या आणि लोकाभिमुख योजना राबवणाऱ्या महायुती सरकारच्या पाठीशी उभे राहील. विरोधक कितीही एकत्र आले तरी महायुती आगामी निवडणुकांत प्रचंड यश मिळवेल व विजय मिळवेल, असा ठाम विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.












Click it and Unblock the Notifications