पाचवीला पुजलेल्या समस्या व घराणेशाहीचा आरोप; धारावीत यंदा राजेश खंदारेंचीच हवा
Maharashtra Assembly Election 2024 : एससी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या धारावी मतदारसंघात गेली चाळीस वर्षांहून अधिक काळ काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात केवळ याच मतदारांच्या जोरावर काँग्रेसने बाजी मारली. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत होत असून काँग्रेसच्या गायकवाड कुटुंबाविरोधात घराणेशाहीचा आरोप केला जात आहे. धारावी पुनर्विकास हा महायुती सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्पही यंदाच्या निवडणुकीत प्रभावी ठरणार आहे. एकंदर सर्व परिस्थिती लक्षात घेता, या मतदारसंघात महायुतीकडून लढणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या राजेश खंदारे यांचे पारडे सध्यातरी जड समजले जात आहे.
कशी होणार धारावीतील लढत
धारावी मतदारसंघात 2004 ते 2019 अशा सलग चार निवडणुकीत म्हणजेच वीस वर्षे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या आमदार होत्या. आता त्या लोकसभेवर गेल्याने या मतदारसंघात काँग्रेसने त्यांची बहिण डॉ. ज्योती गायकवाड यांना उमेदवारी दिली. शिवसेनेचा ठाकरे गटही येथून आग्रही होता. मात्र ही जागा ठाकरे गटाला मिळाली नाही. गेली चार दशके एकाच घराला घारावीचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी काँग्रेसने दिल्याचा, आरोप महाविकास आघाडीकडून झाल्यानंतर धारावीची निवडणूक बदलली.

दुसरीकडे महायुतीने येथून शिवसेना शिंदे गटाने राजेश खंदारे यांना उमेदवारी दिली. मनोहर रायबागे हे यंदाच्या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर लढत आहेत. तर आम आदमी पार्टीचे मुंबई उपाध्यक्ष अॅड. संदीप कटके यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. उबाठा गटाचे बाबुराव माने यांनीही येथून अर्ज भरला होता मात्र तो ऐनवेळी माघार घेतला. त्यामुळे आता धारावीत चौरंगी लढत होणार आहे.
महाविकास आघाडी बँकफूटवर
ही जागा ठाकरे गटाला मिळावी अशी जोरदार मागणी होत होती. ठाकरे गटाकडून बाबुराव माने यांनी अर्जही भरला होता. मात्र ऐनवेळी तो मागे घेतला गेला. ही सल ठाकरे गटाला आहे. त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही एकाच कुटुंबाला गेली 40 वर्षे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिल्याची खंत काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना आहे. वास्तविक वर्षा गायकवाड या लोकसभेला निवडून गेल्यानंतर ही जागा अन्य कार्यकर्त्याला दिली जावी, अशी मागणी होती. मात्र काँग्रेसने पुन्हा गायकवाड कुटुंबात उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडी निवडणुकीआधीच बँकफूटवर आली आहे.
मतांचे विभाजन ठरणार निर्णायक
धारावीत बौद्ध, चर्मकार, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहे. यातील मुस्लिम मते निर्णायक ठरणार असून इतर समाजाच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेली चार दशके एकाच कुटुंबाला धारावीचे प्रतिनिधित्व देण्यात येत असल्याने काँग्रेसमधील घराणेशाहीबद्दल धारावीतील नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे धारावीतील निवडणूक प्रचारात धारावी पुनर्विकास आणि घराणेशाही हेच प्रमुख मुद्दे राहणार आहेत. यामुळे महायुतीचे पारडे सध्या जड दिसत आहेत.
मतदारसंघातील समस्या कायम
या मतदारसंघात 1 लाख 45 हजार 525 पुरुष व 1 लाख 15 हजार 449 महिला मतदार आहेत. मात्र एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघात वर्षानुवर्षे अनेक प्रश्न कायम आहेत. काँग्रेसच्या काळात हे प्रश्न सुटले नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. येथे अनेक परिसरात शौचालये नाहीत. जी शौचालये आहेत ती काँग्रेसने ठेकेदारांच्या घशात घातल्याचा आरोपही होत आहे. नागरिकांना शौचालयासाठी पैसे मोजावे लागत असल्याचे चित्र आहे. धारावी पुनर्विकासाचा प्रश्नही चर्चेत आहे. पावसाळ्यात अनेक प्रभागात पाणी साचते. काँग्रेसला एवढ्या वर्षांत हा प्रश्न सोडवता आलेला नाही. धारावीत वाहतूक कोंडीची समस्या पाचवीला पूजलेली आहे. या सर्व प्रश्नांमुळे महाविकास आघा़डीला ही निवडणूक जड जाणार असल्याचे चित्र आहे.
महायुतीची कोट्यवधींची विकासकामे
या मतदारसंघात सुमारे सव्वा लाख महिला मतदार आहेत. त्यापैकी सुमारे पाऊणलाखांच्या वर महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळालेला आहे. याशिवाय शासनाच्या इतर योजनांचेचही हजारो लाभार्थी आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्प झाल्यास नागरिकांचे आरोग्यमान सुधारणार आहे. शिवाय इतर सुविधाही मिळणार आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनेला महाविकास आघाडी विरोध करत असल्याने त्यांच्याविरोधात सध्या नाराजी दिसत आहे. शासनाचे हजारो लाभार्थी व कोट्यवधींची विकासकामे या जोरावर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश खंदारे यांचे पारडे येथून सध्यातरी जड दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications