पीक विमा भरला का? लवकर भरा, आज शेवटचा दिवस, रुग्णालयातूनही धनंजय मुंडेंची शेतकऱ्यांना साद
मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयात पीक विमा ही संकल्पना राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून, खरीप 2024 हंगामात 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत 1 कोटी 63 लाख 60 हजार पेक्षा अधिक पीकविमा अर्ज दाखल करण्यात आले आहे.
लाखो शेतकऱ्यांनी एक रुपया विमा सहभाग भरून पिकविमा योजनेत याही वर्षी सहभाग घेतला आहे. आज 31 जुलै हा विमा भरण्यासाठी अखेरचा दिवस असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी आपला विमा तात्काळ भरून घ्यावा व आपले पीक विमा संरक्षित करावे असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

एकीकडे उपचार, दुसरीकडे शेतकऱ्यांची काळजी
धनंजय मुंडे यांच्यावर शुक्रवारी (ता.27) मुंबईतील सर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली असून ते पुढील उपचार घेत आहेत. या स्थितीतही धनंजय मुंडे रुग्णालयातूनही त्यांच्याकडून कृषी विभागाचा आढावा घेणे सुरूच आहे. पीक विम्यासह विविध योजनांचा आढावा ते सातत्याने घेत आहेत.
शेतकऱ्यांना मोफत वीज
नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पावर पर्यंतच्या कृषी वीज पंपांना पूर्णपणे मोफत वीज देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर काही दिवसातच याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने निर्गमित करून 'मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने'स आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. याचा लाभ राज्यातील सुमारे 44 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी सुमारे 14 हजार 760 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कापूस-सोयाबीनला हेक्टरी 5 हजारांचे अनुदान
त्याचप्रमाणे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीच सन 2023-24 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भाव पडल्याने जे आर्थिक नुकसान सहन करावे लागले, त्या मोबदल्यात कापूस व सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजारांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण होताच या योजनेसाठी सुद्धा सुमारे 4200 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात आले असून याचा लाभ राज्यातील सुमारे 83 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.
यात राज्यातील सुमारे 53 लाख 83 हजार सोयाबीन उत्पादक (एकूण लाभ - 2612.48 कोटी) तर सुमारे 29 लाख 90 हजार कापूस उत्पादक शेतकरी (एकूण लाभ - 1541 कोटी) याप्रमाणे शेतकऱ्यांना लाभाचे वितरण डीबीटीद्वारे थेट संलग्न बँक खात्यांवर करण्यात येणार आहे. यानिमित्ताने महायुती सरकारच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक पीकविमा
खरीप 2023 मध्ये एक रुपयात पीकविमा ही योजना प्रथमच अंमलात आली होती. त्यानंतर खरिपात राज्यात बहुतांश भागात दुष्काळसदृश परिस्थिती व हवामानातील असमतोल यामुळे झालेल्या नुकसानीच्या पोटी विमा धारक शेतकऱ्यांना आतापर्यंत अग्रीम, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात व पीक कापणी प्रयोगानंतर असे मिळून आतापर्यंत एकूण 7280 कोटी रुपये इतका पीकविमा मंजूर करण्यात आला असून यांपैकी 4271 कोटी रुपयांची वितरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर 3009 कोटी रुपये विमा रक्कम वितरण सुरू आहे.
पीक कापणीचे अंतिम अहवाल निश्चितीनुसार या रक्कमेत आणखी वाढ होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देशात सर्वाधिक पीकविमा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. तसेच योजना सुरू झाल्यापासून ही रक्कम आजवरची सर्वाधिक पीकविमा रक्कम असल्याचेही स्पष्ट झाले आहे.












Click it and Unblock the Notifications