'महाराष्ट्राचा रामायण, महाभारत अन् बुद्धांशी विशेष संबंध'; देवेंद्र फडणवीसांचा दावा, दिला हा पुरावा!
Devendra Fadnavis on Podcast 'Maharashtradharma' : महाराष्ट्रात एकीकडे सुरू असलेल्या मराठी-हिंदी भाषेच्या वादात, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यांनी राज्यातील महायुती सरकारविरोधात एल्गार उगारला. अशातच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या 'महाराष्ट्रधर्म' पॉडकास्टमध्ये महाराष्ट्राचा इतिहासाशी व पौराणिक कथांशी कसा संबंध आहे, यावर नजर टाकली आहे. नुकत्याच प्रसारीत झालेल्या त्यांच्या पॉडकॉस्टमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाविषयी बोलताना फडणवीस यांनी दावा केला की, महाराष्ट्राचा रामायण, महाभारत आणि बुद्धांशी अतिशय खोलवर संबंध आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काय केला मोठा दावा!
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्राची भूमी केवळ राजकीय किंवा भौगोलिकदृष्ट्याच नाही तर धार्मिक, पौराणिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही खूप समृद्ध आहे." यासोबतच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामायण, महाभारत आणि गौतम बुद्धांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भूमिकेबद्दल सविस्तरपणे त्यांची भूमिका मांडली तसेच त्यांनी काही पुराव्यासह या गोष्टी उलघडून सांगितल्या.

रामायणाशी महाराष्ट्राचा इतिहास जोडलेला!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्राची कहाणी देवांच्या पावलांच्या ठशांनी सुरू होते. वनवासात असताना, भगवान राम दंडकारण्य येथे आले, जे आजचे विदर्भ आणि नाशिक प्रदेश आहे. पंचवती हे ते पवित्र ठिकाण आहे जिथे लक्ष्मणाने लक्ष्मणरेखेला काढले आणि रावणाने संताच्या वेषात सीतेचे अपहरण केले. ही भूमी धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्षाची साक्षीदार आहे." मुख्यमंत्री म्हणाले की, कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते अलिकडेच नाशिकला गेले होते तेव्हा हा इतिहास त्यांच्या डोळ्यांसमोर जिवंत झाला.
महाभारताच्या पानांमध्येही महाराष्ट्राचा उल्लेख
फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राची भूमी महाभारत काळाशी देखील जोडलेली आहे. ते म्हणाले, "विदर्भाची भूमी दमयंतीची आहे. एका लोककथेनुसार, अर्जुनाने कोकणातील गुहांमध्ये ध्यान केले. येथेच राजकुमारी रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना पत्र पाठवले आणि कृष्णाने येऊन तिला वाचवले. पांडवांनी चिखलदरा येथे वनवास घालवला आणि किचकसारख्या अत्याचारी राजाला पराभूत केले."
गौतम बुद्ध आणि महाराष्ट्राचा शांततापूर्ण वारसा
पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, भगवान बुद्ध शांतीचा संदेश घेऊन महाराष्ट्रात आले आणि त्यांनी अजिंठा टेकड्यांमध्ये बुद्ध लेण्या बांधल्या. ते म्हणाले, "महाराष्ट्राने बुद्धांचे केवळ उपदेश ऐकले नाहीत तर ते आचरणातही आणले.
ही भूमी सत्य आणि ज्ञानाच्या साधकांसाठी एक आवडते ठिकाण आहे." त्यांनी असेही सांगितले की, शंकराचार्यांनी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी घर सोडले आणि संपूर्ण भारतभर प्रवास केला आणि करवीर (कोल्हापूर) येथे त्यांचे ज्ञानपीठ स्थापन केले. फडणवीस यांच्या मते, महाराष्ट्र हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा आध्यात्मिक दुवा आहे.
वारी परंपरा - भक्ती आणि समतेचा संगम
फडणवीस यांनी वारी परंपरेचे वर्णन महाराष्ट्राचा आत्मा असे केले. ते म्हणाले, "वारी ही केवळ एक धार्मिक घटना नाही, तर सामाजिक समता आणि भक्तीचा जिवंत प्रवाह आहे. येथे कोणताही जातीय भेद नाही. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी एकत्र पंढरपूरला निघाले." एका वारकऱ्याची कहाणी सांगताना फडणवीस म्हणाले, "माझे आजोबा सांगायचे की जेव्हा भगवान राम झाडाखाली थांबायचे तेव्हा झाड स्वतःच गरजूंना फुले अर्पण करायचे. ही केवळ कल्पनाशक्ती नाही तर आपली सांस्कृतिक आठवण आहे."
महाराष्ट्राची संत परंपरा
पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी संत परंपरेबद्दल सांगितले की संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या किशोरावस्थेत ज्ञानेश्वरी लिहिली आणि पसायदान सारखी वैश्विक प्रार्थनागीते रचली. मुक्ताबाईंच्या ओवीत समाजाला प्रश्न विचारण्याची शक्ती होती. संत एकनाथांचे अभंग हे करुणा आणि नैतिकतेचे प्रतीक आहे. संत चोखामेळा यांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता, परंतु आज त्यांची समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहे.












Click it and Unblock the Notifications