राज ठाकरेंचे आभार पण भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही! देवेंद्र फडणवीस हे काय बोलून गेले
Devendra Fadnavis on Maharashtra Next CM : एका कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीनंतर भाजपचा मुख्यमंत्री होईल असे वक्तव्य केले होते. त्यावर आज भाजपचे धुरंधर नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, महायुतीचा मुख्यमंत्री होईल अशी प्रतिक्रीया दिली. एका अर्थाने महायुतीत भाजपसोबतच इतर घटक पक्ष मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत हे त्यांनी स्पष्टच केले आहे.
काँग्रेसचे मुंबईतील नेते आणि पाचवेळा नगरसेवक राहीलेले रवी राजा यांनी आज मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे.

महायुतीचा मुख्यमंत्री होणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज ठाकरे यांनी महायुतीचे सरकार येईल आणि भाजपचा मुख्यमंत्री होईल असं त्यांनी वक्तव्य केले मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या शुभेच्छा मी आभाराने स्वीकारतो पण भाजपचे नाही तर महायुतीचे सरकार येणार आणि भाजपचा नाहीतर महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
राज ठाकरे आम्ही एकत्र राहू..!
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजून आमची सर्व बोलणी सुरु आहे. राज ठाकरे, मुख्यमंत्र्यांशी चर्चा होत आहे. आमचा प्रयत्न आहे की, आम्ही सर्व एकत्र राहू. राज ठाकरे यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. क्षेत्रीय अस्मितेला भाजपचे नेहमीच समर्थन राहीले आहे. त्यासोबतच राष्ट्रीय अस्मिताही महत्वाची ती म्हणजे हिंदुत्व आणि राष्ट्रीय हिंदुत्व राज ठाकरे यांनी स्वीकारली आहे.
फटाके आता वाजणारच
महायुतीत बंडखोरी झाली का यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, 288 मतदारसंघात फक्त 8 ते 10 मतदारसंघात समस्या आहेत. महाविकास आघाडीचे तर अजूनही समजले नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की,पाचवेळा नगरसेवक आणि विरोधी पक्षाचे नेते राहीलेले रवी राजा भाजपमध्ये आज आले. त्यांच्यासोबत काही पदाधिकारीही भाजपमध्ये आले त्यांचे मी आज स्वागत करतो आणि त्यांच्यासह अनेक काही काँग्रेसचे नेते येऊ शकतात ते रवी राजा यांच्या संपर्कात आहेत. असे फटाके आता वाजणारच.
जनता महायुतीची साथ देणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या काळात भाजपमध्ये अनेक नेते प्रवेश करतील, आम्ही बंडखोरांची समजूत घालत आहोत. तिसरी आघाडी बनली लोकशाही आहे ज्यांना जे बनवायचे ते बनवावे प्रश्न हा आहे की, महाराष्ट्राची जनता कुणाला साथ देणार...जनतेने निश्चित केले की, महायुतीला ते साथ देणार आहेत.
सिंचन घोटाळ्याची फाईल गोपनीय नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिंचन घोटाळ्याची फाईल कुठलीही गोपनिय नाही ती माहिती अधिकारात मागवू शकता. अजित पवारांच्या वक्तव्यावर उत्तर आज देण्याची गरज नाही काल ते दिले असे म्हणत यावर दुसऱ्यांदा बोलणे त्यांनी टाळले. तर नवाब मलिक यांना सरकारमध्ये सहभागी करुन घेणार का यावर फडणवीस म्हणाले की, आम्ही त्यांचा प्रचारच करणार नाही तर त्यांना सरकारमध्ये कसे घेणार असा प्रतिप्रश्नही त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना केला.












Click it and Unblock the Notifications