"राजकारण चुलीत गेलं, मराठा आरक्षणावर गणरायासमोर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या संख्येने मराठा समाज जमला आहे. दुसरीकडे, सरकार चर्चेसाठी तयार असून, मराठा आरक्षण समितीचे प्रमुख, माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे, आझाद मैदानावर चर्चेसाठी पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

फडणवीस म्हणाले, "आमच्या तत्त्वात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणे बसत नाही. राजकारण चुलीत गेले, पण एकाच्या समाधानासाठी दुसऱ्याला असंतुष्ट करणे आम्हाला मान्य नाही."
फडणवीस यांचा मराठा समाजासाठीच्या निर्णयांवर भर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या भूमिकेवर भर देताना सांगितले की, २०१४ पासून मराठा समाजाच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ते म्हणाले, "आरक्षणासोबतच आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला एवढे सक्षम केले की आज दीड लाख मराठा तरुण उद्योजक बनले आहेत. सारथी संस्थेमुळे एमपीएससी आणि यूपीएससीमध्ये मराठा तरुणांचा टक्का वाढला आहे. आम्ही दिलेले १० टक्के आरक्षण टिकले आहे." त्यांनी असेही म्हटले की, काही लोकांची यावर वेगवेगळी मते आहेत.
संविधानाच्या चौकटीतच निर्णय
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, कोणताही निर्णय संविधानाच्या चौकटीतूनच घेतला जाईल. "जर आपण एखाद्या समाजाला तात्पुरता आनंद दिला, तर भविष्यात त्याचा मोठा उलट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, सर्वसमावेशक तोडगा काढणे महत्त्वाचे आहे," असे त्यांनी सांगितले. त्यांचा भर सर्व समाजांचे समाधान होईल अशाच निर्णयावर आहे, आणि तो निर्णय संवैधानिक असावा हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications