ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया;पलटवार करत म्हणाले ते रुदालीचे भाषण
Devendra Fadnavis First Reaction on Raj Thackeray and Uddhav : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मुंबईत झालेला मराठी भाषा विजयी मेळाव्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले तर दुसरीकडे ते विजयी मेळाव्याचे भाषण नव्हते तर ते रुदालीचे भाषण होते, असा उपरोधिक टोला लगावत त्यांनी ठाकरे बंधूंवर पलटवार केले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादच मलाच मिळतील, अशा उपरोधिक सूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज व उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनावर भाष्य केले आहे.
मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी दोन बंधू एकत्र आणण्याचे श्रेय मला दिले. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. पण मला असे सांगण्यात आले होते की, तिकडे विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी केवळ रुदालीचे भाषण झाले, असे ते म्हणाले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथील नियोजनाचा आढावा घेत प्रशासनाने केलेल्या तयारीचे तोंड भरून कौतुक केले. आपल्या प्रशासनाने येथे अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे. आता उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. निश्चितपणे यावेळी जशी उत्तम व्यवस्था झाली. आषाढीचे पर्व संपल्यानंतर काही उणिवा राहिल्या काय? हे पुन्हा पाहिले जाईल. पुढच्या वर्षी याहून चांगली व्यवस्था करू, असे ते म्हणाले.
🕞 3.21pm | 5-7-2025📍Pandharpur.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 5, 2025
LIVE | Media Interaction #Maharashtra #Pandharpur https://t.co/Uu4ZcHpKsd
मी राज ठाकरे यांचे आभार मानतो
यावेळी पत्रकारांनी त्यांचे राज व उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाकडे लक्ष वेधले. त्यावर फडणवीस उपरोधिकपणे म्हणाले, मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी दोन बंधू एकत्र आणण्याचे श्रेय मला दिले. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. पण मला असे सांगण्यात आले होते की, तिकडे विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी रुदालीचे भाषण झाले.
मराठीवर एक शब्दही न बोलता, आमचे सरकार गेले, आमचे सरकार पाडले, आम्हाला सरकारमध्ये न्या, आम्हालाच निवडून द्या असे म्हटले गेले. हा मराठीचा विजयोत्सव नव्हता, ही रुदाली होती. या रुदालीचे दर्शन आपल्याला त्या ठिकाणी झाले.
मुळात मुंबई महापालिका 25 वर्षे त्यांच्या ताब्यात होती. त्यानंतरही त्यांना दाखवण्यासारखे एकही काम करता आले नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही मुंबईचा चेहरा बदलला. त्यांच्या काळात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला.
उलटपक्षी आम्ही बीडीडी चाळीतील मराठी माणसांना, पत्राचाळीतील मराठी माणसांना, अभ्युदय नगर येथील मराठी माणसांना त्याच ठिकाणी हक्काचे मोठे घर दिले. याची असुया त्यांच्या मनामध्ये आहे.
आमच्यासोबत मराठी, अमराठी सर्वच
ये पब्लिक है सब जानती है. त्यामु्ळे मुंबईतील मराठी असो की अमराठी माणूस असो, सर्वच आमच्यासोबत आहेत. आम्ही मराठी आहोत. आम्हाला मराठी असल्याचा अभिमान आहे. मराठी भाषेचा अभिमान आहे. पण त्याचवेळी आम्ही हिंदू आहोत. आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे. आमचे हिंदुत्व हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ठणकावून सांगितले.












Click it and Unblock the Notifications