फडणवीसांनी ठरवलं, आता 200 पार...
मुंबई : महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे पार पडला. या महायुतीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना केल्या. तिन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांना कानिपचक्या दिल्या.

फेक नेरेटीव्ह पसरवणाऱ्यांच्या ट्रॅकमध्ये आपण अडकायचं नाही, असे म्हणत फडणवीसांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 200 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.
फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकीपेक्षा आपल्याला आता 25 लाख मतं जास्त मिळवायची आहेत. असे झाले तर आपण 200 जागा सहज जिंकू. तेवढं पोटेंशियल आणि ताकद आपल्याकडे आहे. महायुती पूर्ण ताकदीने आता मैदानात उतरली आहे. लोकसभेला आपली लढाई फेक नेरेटीव्ह या चौथ्या पक्षासोबत होती. त्यांच्या खोटं बोलण्याने आपला पराभव झाला.
असत्यावर एक निवडणूक जिंकता येते, पण सातत्याने खोटं चालत नसतं. हे घरी नवरा-बायकोला तरी खरं बोलतात की नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला. फडणवीसांनी महायुतीतील सर्वच पक्षाच्या प्रवक्त्यांवर तोफ डागली. ते म्हणाले, आज आपलाच एकमेकांत विसंवाद दिसतो, आज आपलेच प्रवक्ते एकमेकांवर बोलत असतात. जर कुणाला बोलायची खुमखुमी असेल त्याने आपआपल्या नेत्यांना अगोदर विचारावे. त्यांच्या नेत्यांनी होकार दिला तर आपली खुमखुमी पूर्ण करावी.
योजना आमच्या पुढाकार यांचा...
आपण लाडक्या बहिणींसाठी योजना सुरु केली. पण आता गावोगावी ह्यांचेच लोकं फॉर्म घेऊन उभे आहेत. या योजनेत आता कुठल्याही अटी-शर्ती नाहीत. तुमच्याकडे रेशनकार्ड नसेल तरीही तुम्हाला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. केवळ, हमी पत्र लिहून तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. आम्ही ही योजना महिलांना बाहेर टाकण्यासाठी नाही, तर योजनेत घेण्यासाठीच राबवत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं.
योजनांची दिली माहिती
फडणवीस म्हणाले, हे सरकार सर्वच नागरिकांसाठी आहे. आपण महिला भगिनींसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. महिलांना एसटीमध्ये सवलत दिली, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत महिलांना मोफत गॅस वाटत करणार आहोत. तसेच, राज्यातील मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णयही आपण घेतला आहे. त्यामुळे, पदवी व पदविका शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थींनींना मोफत उच्चशिक्षण मिळणार आहे. घरात जन्म घेणाऱ्या मुलींसाठीही आपण योजना आणली. माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत मुलीच्या नावे 1 लाख रुपये मिळणार आहेत, हेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठीही योजना
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. त्यामध्ये, केवळ 1 रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. देशात सर्वाधिक पीक विमा आपल्या महाराष्ट्राने दिला आहे. याशिवाय वीज बिल माफीचा निर्णय, मागेल त्याला सौरपंपही देण्यात येत आहे. आपल्याच सरकारने दूध उत्पादकांसाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे, असेही फडणवीसांनी म्हटले.












Click it and Unblock the Notifications