सरकारच्या आशिर्वादाने गुंडांची हिम्मत वाढल्याने पोलीसांवरही हल्ले, नाना पटोलेंची सरकारवर टीका
राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारच्या काळात गुंडांना सरकारी आशिर्वाद मिळत असल्याने गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे, अशी घणाघाती टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
महिला घरात व घराबाहेरही सुरक्षित नाहीत तर शाळेत मुलीही सुरक्षित नाहीत. आता तर कायद्याचे रक्षक पोलीसही सुरक्षित राहिले नाहीत. मुंबईतील माहिम पोलीस कॉलनीत एकाचवेळी 13 पोलिसांच्या घरावर दरोडा पडला व काल पुण्यात पोलीस उपनिरिक्षकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. राज्य सरकारच्या आशिर्वादाने गुंडांची हिम्मत वाढल्याने पोलीसांवरही हल्ले होत आहेत,असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. टिळक भवनमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.

सरकारच्या काळात गुंडांना सरकारी ताकद मिळली
भाजपा युती सरकारने पोलिसांना कमजोर बनवले आहे. या सरकारच्या काळात गुंडांना सरकारी ताकद मिळली आहे. काही गुंड मुख्यमंत्र्यांसोबतच फिरत आहेत तर काहींना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली जाते, काहींना उपचाराच्या नावाखाली हॉस्पिटलमध्ये भरती करुन फाईव्हस्टार सेवा पुरवली जात आहे. सरकारचा आशिर्वाद असल्यानेच गुंड पोलिसांवर हल्ला करण्याची हिम्मत करत आहेत. या सरकारच्या काळात सर्वसामान्य जनता सुरक्षित नाही, सरकार बेशरम असून जनतेला वाऱ्यावर सोडून सर्व बाजूंनी लुटण्याचे काम सुरु असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावच्या कार्यक्रमातही खोटे बोलले. महिलांच्या संदर्भातील शक्ती कायदा राष्ट्रपतींकडे दोन वर्षांपासून पडून आहे. तो मंजूर केला जात नाही आणि गप्पा महिला सुरक्षेच्या मारत आहेत. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे शेतकरी योजनांबद्दल बोलले पण पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांबद्दल एक शब्दही काढला नाही. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला पंतप्रधानांकडे काहीच अर्थ नाही असे दिसले. मुख्यमंत्री शिंदेंनी पुंगी वाजवली पण त्याचा काही उपयोग झाला नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
जो भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांना अतिरेकी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणतो त्यांना शेतकऱ्यांबद्दल काहीच वाटत नाही. लखपती दीदी ही योजनाही फसवी आहे. 1 लाख रुपयांचे कर्ज आधीच मिळत होते ते 5 लाख केले पण त्यासाठी भरमसाठ अटी घातल्या आहेत. त्यामुळे या योजनेचा फायदा होण्यापेक्षा तोटाच होणार आहे, असंही पटोले म्हणाले.
सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना सरकारी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी
केंद्र सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे तशीच राज्यातही ही योजना लागू करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांचा पैसाच कपात करुन त्यांना दिला जाणार आहे. वास्तविक पाहता जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी असताना ती काय लागू केली जात नाही हा प्रश्न असून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये यावर तीव्र नाराजी आहे असेही नाना पटोले म्हणाले.












Click it and Unblock the Notifications