CJI भूषण गवई यांची नाराजी अन् DGP, मुख्य सचिवांसह पोलिस आयुक्तांची पळापळ, मुंबईत नेमकं काय घडलं?
Chief Justice Bhushan Gavais Expressed Displeasure Over Maharashtra Senior Officers : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांची नुकतीच नियुक्ती झाली. त्यानंतर ते महाराष्ट्रात मुंबईत सार्वजनिक कार्यक्रमात आले. या ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात राज्याचे वरिष्ठ अधिकारी गैरहजर असल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालक, मुख्य सचिव व मुंबई पोलिस आयुक्तांची चांगलीच धांदल उडाली. काही वृत्तवाहिण्यांमध्ये सीजेआय यांच्या नाराजीची बातमी येताच तीन्ही अधिकाऱ्यांनी थेट सीजेआय यांचा ताफा गाठणेच पसंद केले.

नेमकं काय व कसे घडले?
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांचा नुकताच सीजेआय पदाचा शपथविधीचा कार्यक्रम दिल्लीत पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भूषण गवई यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.
सरन्यायाधीश पदी नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्राची राजधानी मुंबईत भूषण गवई यांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी हजेरी लावणे अपेक्षित होते. परंतु, ते आले नाही. यामुळे सरन्यायाधीशांनी आपली नाराजी जाहीरपणे भाषणात व्यक्त करुन दाखवली.
भूषण गवई नेमकं काय म्हणाले?
भूषण गवई यांनी आपल्या भाषणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अनुपस्थितीवर खंत व्यक्त केली. सरन्यायाधीश म्हणून मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार राज्याचे पोलीस महासंचालक, राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस आयुक्त उपस्थित राहणं अपेक्षित होतं. पण या अधिकाऱ्यांना इकडे का यावं वाटलं नाही? याचा त्यांनी स्वत: विचार करावा, अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली.
नाराजी व्यक्त करत असताना सरन्यायाधीशांनी आपल्या पंजाब येथील कार्यक्रमाचा दाखला दिला. पंजाबला आयोजित कार्यक्रमाला गेलो असता त्या कार्यक्रमाला प्रोटोकॉलनुसार तिथल्या राज्याचे पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि मुख्य सचिव कार्यक्रमाला उपस्थित होते, असं सरन्यायाधीश गवई यांनी सांगितलं.
खंत व्यक्त करताच पळाले वरिष्ठ अधिकारी
भूषण गवई यांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त केल्यानंतर लगेच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी चैत्यभूमीच्या दिशेला धाव घेतली. तोपर्यंत कार्यक्रम आटोपला होता. सरन्यायाधीश भूषण गवई भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले होते. यावेळी महाराष्ट्राचे तीनही वरिष्ठ अधिकारी चैत्यभूमीवर दाखल झाल्याचे पाहायला मिळाले, असे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले.
भाषणादरम्यान सरन्यायाधीश गवई भावुक झाले
बार काऊंसिलच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात पुढे बोलताना सीजेआय भूषण गवई हे भावूक झाले. लोकांचा त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम पाहून ते म्हणाले की, मी सर्वांचा खूप आभारी आहे. मला मिळालेल्या प्रेमाने आणि आदराने मी भारावून गेलो आहे. मला हे प्रेम गेल्या 40 वर्षांपासून मिळत आहे. आजचा सोहळा अविस्मरणीय आहे. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मला शब्द सापडत नाहीत.
14 मे रोजी मी भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली तेव्हा महाराष्ट्राने माझ्यावर खूप प्रेम केले. राज्यभरातील लोकांनी हा सोहळा पाहण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु मर्यादांमुळे मी सर्वांना सहभागी करू शकलो नाही, असेही त्यांनी सांगितले.
सरन्यायाधीश म्हणाले- तिन्ही स्तंभांनी एकमेकांचा आदर करावा
सत्कार कार्यक्रमात पुढे बोलताना सीजेआय भूषण गवई म्हणाले की, देश केवळ मजबूत झाला नाही तर सामाजिक आणि आर्थिक आघाड्यांवरही विकसित झाला आहे आणि तो अजूनही वाढत आहे. देशाची मूलभूत रचना मजबूत आहे आणि संविधानाचे तिन्ही स्तंभ समान आहेत. संविधानाच्या सर्व भागांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. न्यायपालिका, कार्यकारी मंडळ किंवा संसद हे सर्वोच्च नाही, परंतु भारताचे संविधान सर्वोच्च आहे आणि तिन्ही अंगांना संविधानानुसार काम करावे लागते.












Click it and Unblock the Notifications