'लाडकी बहिण'योजना कशाला? कांद्याला भाव द्या! बच्चू कडू म्हणाले - लुटणारी व्यवस्था उखडून फेकणार!
Bachu Kadu's criticism of the cm shinde government :प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी या योजनेवरुन सरकारवर सडकून टीका केली आहे. योजना देण्यापेक्षा कांद्याला भाव द्या असे बच्चू कडूंनी सुनावले आहे. ते काल नाशिकमधील उमराणा येथे जाहीर सभेत बोलत होते.
बच्चू कडू आपल्या भाषणात म्हणाले की, "तुम्ही आम्हाला योजना काय देता?, आमच्या कांद्याला भाव द्या, आम्ही प्रत्येक आमदाराला वर्षाला 4 क्विंटल कांदा, मुख्यमंत्र्यांना 15 क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ."

लुटणारी व्यवस्था उखडून फेकणार
बच्चू कडू म्हणाले- शेतमालाचे भाव पडतात तेव्हा खासदार, आमदार बोलत नाही. तेव्हा तुम्हाला तुमचा पक्ष लाडका असतो. आता आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखविणार, तुम्ही आम्हाला रडवलं आता आम्ही तुम्हाला रडवणार. काँग्रेस व भाजपने निर्माण केलेली लुटणारी व्यवस्था उखडून फेकणार आहोत, असा हल्लाबोल आमदार कडू यांनी केला.
अन्यथा तुमचे थोबाड लाल करु, वाणिज्यमंत्र्यांना इशारा
निफाड येथील शेतकरी मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान शेतकऱ्यांनी नाफेड, एनसीसीएफच्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार बच्चू कडू यांच्याकडे असता लासलगाव येथे दिव्यांगांना रेशन कार्ड व प्रमाणपत्र वाटपानंतर बच्चू कडू यांनी नाफेडच्या गोडावूनवर जात पाहणी करत संताप व्यक्त केला. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी कांदा खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी व यात लक्ष घालावे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. मागणी मान्य झाली नाही तर अन्यथा तुमच्या गाडीवर कांदा फेकत थोबाड लाल करू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
नाशिकमधून 2 विधानसभा मतदारसंघांत रणशिंग फुंकले
बच्चू कडू यांनी नाशिक जिल्ह्यातून आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. चांदवड -देवळा मतदार संघातून गणेश निंबाळकर तर निफाडमधून गुरुदेव कांदे यांची प्रहारकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शेतक-यांचा सातबारा कोरा झाला तरच भरोसा वाढेल
दोन दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी अमरावतीत माध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते की, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला तर सरकारवरील यांचा भरोसा वाढेल. नाही तर वाढणार नाही. उलट सरकारला धोका भेटेल. केंद्र सरकारने सोयाबीन व कापसाचे हमीभाव दोन हजार रुपये कमी केले. त्यामुळे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच नुकसान झाले. बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले की, राजकारण शेतकऱ्यांच्या भोवती फिरलं पाहिजे. जसं जाती-धर्माभोवती राजकारण फिरत; तसं शेतकऱ्याच्या भोवती ज्या दिवशी राजकारण फिरेल, तेव्हा शेतकरी शेतमजुरांचेही भले होईल.












Click it and Unblock the Notifications