'त्या' पक्षाचा पाठींबा घेऊन आम्हीच सत्ता स्थापन करु; बच्चू कडू यांचा मोठा दावा
Maharashtra Assembly Election 2024- महाराष्ट्रात विधानसभेसाठी काल बुधवारी मतदान पार पडले. या निवडणुकीत सत्ताधारी महायुती विरोधात महाविकास आघाडी अशीच मुख्य लढत झाली. मात्र तरीही बच्चू कडूंसह तिसऱ्या आघाडीने व अपक्षांनीही काही जागांवर रंगत आणली. काल अनेकांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले. त्यापैकी अनेक पोलनुसार राज्यात अपक्षांनीही चांगलाच भाव खाल्लेला दिसून आला. याच पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनीही एक मोठा दावा केला. या दाव्यानंतर राजकीय विश्लेषकांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या.

काय सांगताहेत एक्झिट पोल
निवडणुकीनंतर काल अनेकांनी आपले अंदाज व्यक्त केले. त्यात महायुती पुन्हा सत्ता स्थापन करेल, अशी शक्यताही दिसली. मात्र महाविकास आघाडीनेही काटे की टक्कर दिल्याचेही अनेक सर्वेमधून स्पष्ट झाले. या दोघांनाही बहुमतापर्यंत जायचे असेल तर अपक्षांना हाताशी धरावे लागेल, असे काही राजकीय विश्लेषकांना वाटते. या निवडणुकीत काहींनी १० ते १५ तर काहींनी थेट १५ ते २० अपक्ष निवडून येतील अशी शक्यता व्यक्त केली आहे. या शक्यतानंतर बच्चू कडू यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
काय केलाय बच्चू कडू यांनी दावा
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बच्चू कडू यांनी राज्यात सत्तेत सहभागी होण्याचा दावा केला आहे. आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे किमान १५ आमदार निवडून येतील, अशी शक्यताही त्यांनी मांडली आहे. ते म्हणाले, आम्ही सध्या इतर अपक्ष आमदारांच्या संपर्कात आहोत. सगळे अपक्ष मिळून आम्ही बांधणी करणार आहोत. कोणाला सोबत घ्यायचं आणि कुणाला नाही, हे आम्ही ठरवणार आहोत. आम्ही कुणासोबत जाणार, हे मोठे पक्ष ठरवू शकत नाहीत. राज्यातील सरकार अपक्ष आणि लहान पक्षच चालविणार आहेत. येणार सरकार हे आमचं असेल. मोठे पक्ष पाठिंबा देतील. पण काही मोठ्या पक्षांसाठी आमचा फोन नॉट रीचेबल असेल", असा थेट इशाराही बच्चू कडूंनी दिला.
सत्ता आमचीच स्थापन होणार- कडू
आम्ही सध्या अनेक अपक्ष आमदारांच्या संपर्कात आहोत. आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, असा दावा करत बच्चू कडू म्हणाले, "माझ्या मतदारसंघात भाजपने अतिशय खालच्या पातळीवर राजकारण केलं. काँग्रेस आणि भाजप हे सध्या संभ्रमात आहेत. माझा विजय हा निश्चित होणार आहे. राज्यात आम्हीच सत्ता स्थापन करणार आहे, हे सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे. एखाद्या मोठ्या पक्षाला आम्हाला पाठींबा द्यावा लागेल. आम्ही सत्ता स्थापन करु", असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.












Click it and Unblock the Notifications