आम आदमी पक्षाचं ठरलं! स्वबळावर महाराष्ट्रात विधानसभेच्या सर्वच्या सर्व 288 जागा लढविणार
Arvind Kejriwal, Maharashtra Assembly Election 2024 : महाविकास आघाडी, महायुती आणि मनसे नंतर आता आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. हा पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढवणार असून राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांत उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. ही माहिती राज्य संघटन मंत्री संग्राम घाडगे पाटील यांनी परभणीत पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांतच होणार असून अनेक पक्षांनी प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी तसेच उमेदवारी घोषित करण्याची तयारी सुर केली आहे. त्यात आम आदमी पक्षाचीही तयारी सुरु आहे. या संदर्भात पक्षाचे राज्य संघटनमंत्री संग्राम घाडगे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी पक्षातीलच नव्हे, तर अन्य पक्षातील बरीच नेते मंडळी इच्छुक आहेत.

आप स्वबळावर निवडणूक लढवणार
शेतकरी, विद्यार्थी, महिला यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम आदमी पार्टी महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढणार आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष हा इंडिया आघाडीमध्ये सहभागी होता पण आता राज्यात स्वबळावर निवडणुक लढविण्याचा निर्णय घेण्यातआला आहे.
दिल्लीत मोफत वीज, पाणी आरोग्याच्या सोई
संग्राम घाडगे म्हणाले, अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी सरकारने दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत. मुलांचे शिक्षण, 300 युनिट पर्यंत वीज मोफत, पिण्याचे पाणी, आरोग्याच्या सुविधा या मूलभूत सोयी दिल्लीकरांना आम आदमी पार्टीच्या सरकारने सुखकर करून दिल्या आहेत. यामुळेच दिल्लीनंतर पंजाबमध्ये देखील आम आदमी पार्टीने आपले सरकार स्थापन केले.
मराठवाड्यातील तिस-या उमेदवाराची घोषणा
मराठवाड्यातील तीन जागा आम आदमी पार्टीने जाहीर केल्यात बीड, लातूर पाठोपाठ परभणी विधानसभेचा उमेदवार आम आदमी पार्टीच्या राज्य संघटक संग्राम पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात आला आहे. पाटील यांनी सतीश चकोर यांच्या नावाची घोषणा केली आहे. यावरुन मराठवाड्यातील बीड, लातूर पाठोपाठ परभणीतही आप उमेदवार लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील 36 जागा लढण्याची तयारी
आम आदमी पार्टीच्या नेत्या आप प्रीती शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेतून त्यांनी आम्ही विधानसभा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. प्रीती शर्मा म्हणाल्या होत्या की, आगामी विधानसभा निवडणुका आम्ही आम आदमी पार्टी एकट्याने लढायच्या तयारीत आहोत. मुंबईतील 36 जागा लढण्याची तयारी आम्ही केली आहे असेही त्यांनी सांगितले होते.
'आप'चे दोन राज्यात सरकार
आम आदमी पार्टी या शतकातील सर्वात यशस्वी राजकीय पक्ष आहे. फक्त 2012 मध्ये स्थापन झालेल्या राजकीय पक्षाने आतापर्यंत दोन राज्यात सरकार स्थापन केलं आहे. आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार आहे, असंही शर्मा यांनी सांगितले होते.












Click it and Unblock the Notifications