Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलिस अधिकारी कोण? जाणून घ्या
Akshay Shinde Encounter : बदलापूर येथील शालेय मुलीशी गैरकृत्य केल्याचा आरोप असलेला संशयित आरोपी अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाला. या चकमकीवर एकीकडे विरोधक प्रश्नचिन्ह लावत असताना आता या घटनेवरुन राजकारण सुरु झालं आहे. बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलिस अधिकारी कोण हा प्रश्न अनेकजण विचारत असून आपण जाणून घेऊया या अधिकाऱ्याविषयी...
बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन विद्यार्थींनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी काल पोलिस चकमकीत मृत्यू झाला. मुंब्रा बाह्यवळण मार्गाजवळ पोलिस वाहनातच गोळाबाराच्या घटनेत अक्षय शिंदे ठार झाला. अक्षय शिंदेने एका पोलिस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून तीन गोळ्या झाडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले. दरम्यान, प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार केला असता अक्षयचा मृत्यू झाला. गोळी झाडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने यापूर्वी प्रसिद्ध चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मांबरोबर काम केले होते, अशी माहिती समोर येत आहे.
कासकरला अटक करणाऱ्यात होता सहभाग
1983 मध्ये पोलीस दलात दाखल झालेले प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी आपल्या कारकिर्दीत 100 हून अधिक गुन्हेगारांचा सामना केला आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये संजय शिंदे यांचाही समावेश होता. बदलापूर बलात्कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) त्याला भाग बनवण्यात आले आहे.
पोलिस चौकशीदरम्यान खुनाचा आरोपी विजय पालांडे याला पोलिस कोठडीतून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर आहे. पालांडे यांच्या गाडीत त्यांचा गणवेशही सापडला होता. संजय शिंदे यांचा २०१४ मध्ये मुंबई पोलिस दलात पुन्हा समावेश केला होता.
विरोधकांचा आरोप
आरोपीला न्यायालयात हजर करण्यापूर्वीच ठार मारल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यासंदर्भात विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर प्रश्नचिन्ह लावलं आहे. त्यामुळे पीडित कुटुंबीयांना न्याय मिळू शकणार नाही असे म्हणत शिवसेना (यूबीटी) नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आपला निषेध व्यक्त केला आणि म्हटले की यातून सरकारची अक्षमता दिसून येते. एनकाऊंटरची स्क्रिप्ट सरकारने लिहिली आणि अंमलात आणली असा त्यांचा आरोप आहे.












Click it and Unblock the Notifications