सरपंच ते विधान परिषद सदस्य; आमश्या पाडवी अक्कलकुवा विधानसभेच्या रिंगणात
महाराष्ट्राचे राजकारण प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, जळगाव, पूर्व विदर्भ अशा टापूत प्रामुख्याने केंद्रित राहिलेले आहे. पालघर, धुळे, नंदुरबार, गोंदिया अशा जिल्ह्यांची फारशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात होताना दिसत नाही. पण या जिल्ह्यात देखील लढाऊ कार्यकर्त्यांनी आपली कारकीर्द गाजवली आहे. आदिवासी बहुल असलेले हे जिल्हे म्हणजे अत्यंत दुर्गम आणि विकासाचा फारसा स्पर्श न झालेले. येथील कार्यकर्त्यांना राजकीय वारसा अभावानेच मिळतो. ज्या कार्यकर्त्यांना वारशाचे पाठबळ मिळते ते वर्षानुवर्षे सत्ता गाजवतात. पण अनेक कार्यकर्ते अशा प्रस्थापितांशी झुंज देऊन स्वतःची कारकीर्द घडवतात. शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी अशाच झुंजार कार्यकर्त्यांपैकी एक आहेत.
रंजक राजकीय प्रवास
कोणतेही राजकीय वारसा किंवा आर्थिक पाठबळ नसलेल्या आमच्या पडवी यांचा राजकीय प्रवास फारच रंजक आहे. अक्कलकुवा तालुक्यातील अंकुशविहीर गावच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे पाडवी १९९८ पासून २०१९ पर्यत २१ वर्षे अक्कलकुवा पंचायत समितीचे सदस्य राहिले आहेत. २००१ ते २००८ या कालावधीत अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.२०१४ मध्ये शिवसेनेत दाखल झालेल्या पाडवींची शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख अशी चढती कमान राहिली आहे. कॉंग्रेस आणि भाजपचे वर्चस्व असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील कट्टर आदिवासी शिवसैनिक म्हणून पाडवींकडे पाहिले जाते.

२०१४ साली शिवसेनेत
२०१४ मध्ये पाडवी यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०१६ साली त्यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्याकडे शहादा, धडगाव आणि अक्कलकुवा या तीन तालुक्यांमध्ये शिवसेना वाढविण्याचे काम सोपविण्यात आले. संघटनेची जबाबदारी पाडवी यांनी व्यवस्थित निभावली. जिल्हाप्रमुख असलेल्या पाडवी यांनी २०१४ आणि २०१९ अशा दोन विधानसभा निवडणुका लढविल्या. विधानसभेच्या मागील निवडणुकीत काँग्रेसचे माजी आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांना त्यांनी जोरदार टक्कर दिली. त्यांचा अवघ्या दोन हजार ९६ मतांनी पराभव झाला. त्यांची ही कामगिरी नेतृत्वाच्या नजरेत भरणारी होती. त्यामुळे त्यांना संधी मिळत गेली. 2022 साली झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने त्यांना तिकीट दिले. आणि आवश्यक मतांची बेगमी झाल्यामुळे पाडवी विधान परिषदेवर निवडून गेले. एका छोट्याशा गावचा सरपंच ते स्वतःच्या कर्तबदारीने विधान परिषदेच्या सदस्य असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
राजकीय नाट्य
पाडवी यांची विधान परिषदेवर निवड होत असतानाच महाराष्ट्रात वेगळेच नाट्य रंगत होते. पाडवी यांच्या मतांची मोजणी केली जात असतानाच एकनाथ शिंदे आपल्या सहकारी आमदारांसह सुरतच्या दिशेने रवाना झाले. शिवसेनेतील तब्बल 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठबळ दिले. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि अपक्ष आमदारही लगोलग शिंदे यांच्याकडे सुरत आणि गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाले. आणि महाराष्ट्रात मोठे सत्तांतर घडले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. वर्षभरातच अजित पवार आपल्या चाळीस आमदारांना घेऊन शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले.,आमश्या पडवी यांनी सुरुवातीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहणे पसंत केले होते पण लोकसभा निवडणुकीच्या काही काळ अगोदर ते एकनाथ शिंदे यांच्याकडे दाखल झाले. पाडवी हे शिवसेनेचा आदिवासी चेहरा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रवेशावेळी स्पष्ट केले. आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे यांनी पाडवी यांना अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील जाहीर केली.
महायुतीची अनेक विकासकामे
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या माध्यमातून अनेक विकास कामे राबविण्यात आली आहेत. रुपये दोन ते तीन लाख इतके अर्थ सहकार्य करून 1000 जणांना सरकारच्या माध्यमातून घरे बांधून देण्यात आली आहेत. प्रधानमंत्री बिजली योजनेचा लाभ तब्बल 1500 लाभार्थ्यांना देण्यात आला आहे .सोलर पंप देणाऱ्या प्रधानमंत्री खेती योजनेच्या माध्यमातून 1000 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.देशी जनावरांच्या संगोपन आणि संवर्धनासाठी प्रत्येकी रुपये 80 हजार इतके आर्थिक सहाय्य देऊन अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात तबेले आणि मोठे उभारण्यात आले आहेत. शेकडो आदिवासी बांधवांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक देण्यात आला आहे. दोन लाख 47 हजार 745 लाभार्थी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात आहेत. हा आकडा खूपच मोठा आहे.
आमश्या पडवी यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. एका छोट्या ग्रामपंचायतीचे सरपंच ते विधान परिषदेचे आमदार असा प्रवास त्यांनी केला आहे. धडाडीचा आणि आक्रमक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या योजनांचा राजकीय लाभ पाडवी यांनाच मिळण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications