जिंकणार अशी खात्री होती, पण खरं सांगू का .. अजितदादांनी बारामतीकरांसमोर थेट मनातलं सांगितलं...
उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर अजित पवार आज पहिल्यांदात बारामतीत गेले. आभार मेळाव्यात त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले. आपल्या खुमासदार भाषणात त्यांनी आपल्या मनातील सगळं, बारामतीकरांसमोर मांडलं. निकालाच्या दिवशी माझी आई थेट देवघरात बसून नामजप करत होती, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

बारामतीत दादांचा सत्कार
विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रीमंडळाची घाई असल्याने अजित पवार बारामतीकरांना वेळ देऊ शकले नव्हते. आता खातेवाटप झाल्यानंतर अजित पवारांचा बारामतीकरांनी जंगी सत्कार केला. या कार्यक्रमात अजित पवारांचे भाषण चांगलेच गाजले. विधानसभा निवडणुकीत तयार केलेली रणनिती, प्रचार, विश्वास असं सगळं मनातलं अजितदादांनी ओठांवर आणलं. निकालाच्या दिवशी घरातलं वातावरण कसं होतं, हेही अजित पवारांनी थेट स्टेजवर सांगितलं.
आई देवघरात बसून
निकालाच्या दिवशीचा आपल्या आईचा किस्साही अजित पवारांनी भाषणात सांगितला. ते म्हणाले, लोकसभेला बारामतीतील ३८२ बुथवर आम्ही मागे होतो. विधानसभा निवडणूक निकालाच्या दिवशी एका चॅनलने मी पोस्टल मताच्या मोजणीत मागे असल्याची बातमी दिली. ते ऐकून आई थेट देवघरात जाऊन बसली. विठ्ठलाचा नामजप तिने सुरु केला. माझी बहिण विजया आक्का हिने आईला विजयाची खात्री दिली, मात्र आईने ऐकलं नाही. आई देवासमोरच बसून राहिली. विजया आक्काने, आम्ही बारामतीत फिरलोय, दादाच जिंकणार असं सांगितलं, पण आईने विठ्ठलाचा नामजप सोडला नाही.
विजयाची खात्री पण...
अजित पवार म्हणाले, लोकसभेत पराभव झाला होता. पण आम्ही विधानसभेला जोर लावला. शेतकरीवर्गासाठी योजना आणल्या. वीजबिल माफी केली. जनसन्मान यात्रा काढून राज्यभर फिरलो. मात्र राज्यभर फिरताना कुणावरही टिका करायची नाही, हे तारतम्य पाळले. महायुतीच्या योजना थेट तळागाळापर्यंत पोहोचवायच्या, हे आम्ही ठरवलं होतं. तसंच केलं. आत्तापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यात यावेळी विक्रमी मतदान झालं. विजयी होऊ अशी खात्री होती, पण खरं सांगू का, निवडणूक एवढी एकतर्फी होईल, असं वाटलं नव्हतं.
लाडक्या बहिणींचेही कौतूक
विधानसभेची रणनिती सांगताना अजित पवार म्हणाले, आम्ही सगळ्या योजना सामन्यांपर्यंत पोहोचवल्या. लाडकी बहिण योजना तर मास्टरस्ट्रोक ठरली. आम्ही लोकसभेला पराभूत झालो त्यावेळी ईव्हीएमला दोष दिला नाही. पराभवाची कारणे शोधली व रणनिती आखली. बारामतीकरांनी मला धो-धो मतांनी निवडून दिलं. त्यामुळे आज मी बारामतीकरांसमोर नतमस्कर व्हायला आलो आहे, असंही अजितदादांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications