मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार म्हणाले-सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही
Ajit Pawar- Sunetra Pawar Ganeshotsav Pune : आज अनंत चतुर्दशीदिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहेत. गणेश विसर्जनाची सर्वत्र तयारी सुरु आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह दगडूशेठ हलवाई गणपतीची पुजा केली.
यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शांततेत आणि उत्साहात बाप्पाला निरोप द्यावा आणि नागरिकांनी, गणपती मंडळांनी आपापली जबाबदारी पार पा़डत शांततेच्या मार्गाने सहभागी व्हावे असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
मुख्यमंत्रीपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, सगळ्यांना आपले नेते मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणताच पत्रकारांनी 'तुम्हालाही वाटतं का?' असा प्रतिप्रश्न केला. त्यावर अजितदादांनी चिडून 'सगळ्यांना वाटतं म्हटल्यावर त्यात दादाही आलाच असे उत्तर दिले आणि मग एकच हशा पिकला.

अजित पवार म्हणाले की, आपला मुख्यमंत्री व्हावा असं सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत असते. प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारचं मत असतं, पण सर्वांचीच इच्छा पुर्ण होते, अशातला भाग नाही. जागा एकच असते, त्याला तुमच्याकडे 145 चा पाहिजे, तर दुसरी गोष्ट कोणालाा निवडून द्यायचे हे मतदार राजाच्या हातात असते. हे असल्यामुळं लोकशाही, संविधान, डॉ.बाबासाहेबांनी दिलेला मतदानाचा अधिकार, या बाबी महत्त्वाच्या आहेत. शेवटी सर्वांच्या बाबतीत चांगलं व्हावं, ही सर्वांचीच इच्छा असते. त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतात, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच निवडणुका लढणार
अजित पवार यांनी निवडणुका कुणाच्या नेतृत्वात लढणार यावर स्पष्ट सांगितले, ते म्हणाले की महायुतीचं सरकार आणण्यासाठी आम्हा सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसू आणि निर्णय घेऊ. आत्ताच्या विधानसभा निवडणुका आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत.
गणेश मंडळांना अजित पवार यांचे आवाहन
माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, मला दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे विसर्जन साधारण संध्याकाळी 4 वाजता करण्याचं नियोजन केलं आहे असं सांगण्यात आले आहे. सर्व गणेश मूर्तींचं त्या त्या दिवशीच विसर्जन झालं तर पोलीस, नागरिकांच्या दृष्टीनं ते बरं असते. नाहीतर 36 तास मिरवणूक चालली तर पोलिसांवरही अतिरिक्त ताण निर्माण होतो. सगळ्यांनी अशा उत्सवाच्या वेळी आपली कर्तव्ये, बंधनांचे पालन करावं. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर असते, पण नागरिकांनीही बंधने पाळली पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.












Click it and Unblock the Notifications