आपलं वाटोळं झालं, आयटी पार्क बाहेर चाललं.., अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांना खडेबोल सुनावले!
Ajit Pawar briefs Hinjwadi sarpanch : महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात. जे काम नियमानुसार होणार नाही, त्यावर ते कधीही पांघरूण घालत नाहीत, तर थेट बोलून दाखवतात. त्यांची हीच शैली पुन्हा एकदा हिंजवडीतील एका पहाटेच्या पाहणी दौऱ्यात दिसून आली, जिथे त्यांनी विकासकामांमध्ये अडथळे आणणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आणि हिंजवडीच्या सरपंचांनाही खडेबोल सुनावले. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं हिंजवडीत?
मागील काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील हिंजवडी परिसरातील सर्व समस्या जाणून घेतल्या होत्या आणि त्या तातडीने सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि इतर नागरी समस्यांनी त्रस्त असलेल्या हिंजवडीला दिलासा देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते. त्यांच्या आदेशानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि इतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या होत्या.
आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी पहाटेच्या सुमारास हिंजवडीत पाहणी दौरा केला. दोन आठवड्यांपूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचे पालन करत विकासकामांना सुरुवात झाली आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी ते स्वतः मैदानात उतरले होते. प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्याचे चित्र असले तरी, अजूनही काही व्यक्ती या विकासकामांमध्ये अडथळे आणत असल्याचे अधिकाऱ्यांनी अजित पवारांना सांगितले.
'आपलं वाटोळं झालं, आयटी पार्क बाहेर चालले...'
विकासकामांची पाहणी करत असतानाच अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांनाही चांगलेच सुनावले. सरपंच जांभुळकर अजित पवारांशी बोलत असताना, "अहो, असू द्या हो, असू द्या हो साहेब, धरण करताना मंदिर जातातच की नाही," असे काहीसे उत्तर देताना दिसले. यावर अजित पवार चांगलेच संतप्त झाले.
त्यांनी थेट सरपंचांना सुनावले, "तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो, पण मी काय करायचं तेच करतो... आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बाहेर चाललंय... माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर.... बेंगलोरला, हैदराबादला... काय तुम्हाला पडलं नाही.... कशाला मी सहा वाजता पाहणी करायला येतो इथं, मला कळत नाही माझी माणसं नाहीत... हे केल्याशिवाय गत्यंतर नाही..." अजित पवारांच्या या शब्दांतून हिंजवडीच्या विकासाची त्यांना किती चिंता आहे, हे स्पष्ट दिसून येते.
'कोणीही मध्ये आलं तर ३५३ टाका..'
अजित पवारांनी पहाटेच अधिकाऱ्यांची 'शाळा' घ्यायला सुरुवात केली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, "आपलं असं ठरलंय, कामाच्या मध्ये कोणी आलं तर त्यावर कलम ३५३ दाखल करा. तो कोणीही असेल तरी करा. अजित पवार जरी मध्ये आला तरी ३५३ दाखल करायचा.
बाकीचं कोणाचं काय ठेवायचंच नाही. ३५३ लावायचा, कारण त्याच्याशिवाय हे काम होणार नाही. नाहीतर प्रत्येक जण माझं हे करा, माझं ते करा असं करत राहील. आपल्याला संपूर्ण काम करून टाकायचं आहे."
अजित पवार पुन्हा संतापले..!
यावरून अजित पवारांचा विकासकामांप्रती असलेला निर्धार आणि कामातील पारदर्शकतेचा आग्रह दिसून येतो. पहाटेच्या सुमारास त्यांनी हिंजवडीतील सर्व समस्यांची स्वतः पाहणी केली. रस्ते, वाहतूक कोंडी आणि इतर नागरी समस्यांबाबत अजित पवार पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले.
कोणी विकासकामांच्या आड आलं, तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यांनी मेट्रो प्रशासन आणि पीएमआरडीए प्रशासनाला दिलेल्या सुधारणा करण्याच्या आदेशांची अंमलबजावणी झाली आहे की नाही, हे पाहण्यासाठीच ते पुन्हा आले होते.












Click it and Unblock the Notifications