Nepal : नेपाळमध्ये जनआक्रोश: तरुणांचा एल्गार, घुसले थेट संसदेत; पोलिसांनी गोळीबार, नेमका रोष कशाचा?
Nepal Protests 2025 Youth Rise Against Corruption : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये सध्या जनआक्रोशाचे वातावरण आहे. भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावर बंदी या सरकारच्या निर्णयांविरोधात तरुणांनी मोठे आंदोलन पुकारले आहे.
हे आंदोलन इतके तीव्र झाले आहे की, सोमवारी (सप्टेंबर 8) हजारो निदर्शक थेट संसदेच्या आवारात घुसले. नेपाळच्या इतिहासात संसदेत घुसखोरीची ही पहिलीच घटना असून, यामुळे परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे.

आंदोलनाचे कारण काय?
या आंदोलनाची सुरुवात दोन प्रमुख मुद्द्यांवरून झाली आहे.
भ्रष्टाचार
नेपाळमधील वाढता भ्रष्टाचार आणि आर्थिक असमानता हा तरुणांमध्ये असंतोषाचा मुख्य मुद्दा आहे. देशातील सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि त्यांना परदेशात जाण्यास भाग पाडले जात आहे. याचा थेट संबंध भ्रष्टाचाराशी जोडला जातो.
सोशल मीडिया बंदी
नेपाळ सरकारने ३ सप्टेंबर रोजी फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबसह २६ सोशल मीडिया साईट्सवर बंदी घातली. मंत्रालयाकडे नोंदणी नसलेल्या प्लॅटफॉर्मवर ही बंदी घालण्यात आली. सरकारने घेतलेल्या या निर्णयावर तरुणांनी तीव्र आक्षेप घेतला आहे, कारण यामुळे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे.
संसद भवनासमोर हिंसाचार
सोमवारी, 'जनरल-जी' म्हणून ओळखले जाणारे १८ ते ३० वयोगटातील तरुण संसद भवनासमोर मोठ्या संख्येने जमले. 'हामी नेपाळ' या गटाने आयोजित केलेल्या या निदर्शनासाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती, पण तरीही निदर्शने नियंत्रणाबाहेर गेली.
पोलिसांनी निदर्शकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या, पाण्याच्या तोफा आणि गोळीबार केला. काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, या गोळीबारात एका आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन काठमांडू जिल्हा प्रशासनाने शहराच्या प्रमुख भागांत दुपारी १२:३० ते रात्री १०:०० पर्यंत कर्फ्यू लागू केला आहे. संसद भवन, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान निवासस्थानाजवळ मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि लष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत.
जनतेचा पाठिंबा
या आंदोलनाला केवळ नेपाळमधीलच नाही, तर परदेशात राहणाऱ्या नेपाळी तरुणांनीही पाठिंबा दिला आहे. त्यांनी आपले मत मांडताना म्हटले आहे की, जर भ्रष्टाचार आणि असमानता दूर झाली नाही, तर अनेक सुशिक्षित तरुणांना देश सोडावा लागेल.
काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांनीही या आंदोलनाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी म्हटले की, जरी वयामुळे ते आंदोलनात सहभागी होऊ शकत नसले, तरी तरुणांचा आवाज ऐकणे खूप महत्त्वाचे आहे.
सध्या सुरू असलेली ही निदर्शने नेपाळच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू करत आहेत. तरुण पिढी त्यांच्या हक्कासाठी आणि भविष्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. सरकारच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.












Click it and Unblock the Notifications