बांगलादेशात हिंदूंचं रक्षण केले जाईल! मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन
Bangladesh Violence : गत काही महिन्यांपासून बांगलादेशात हिंसाचार होत असून पंतप्रधानपदावरुन शेख हसीना याही पायउतार झाल्या आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर हिंदूंवरही हल्ले होत असून बांगलदेशातील हिंदू समाजात असुरक्षितता निर्माण झाली आहे. अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला असून बांगलादेशातील हिंदुंचं रक्षण केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
आरक्षणासंदर्भात बांगलादेशात शेख हसीना सरकारविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं होतं. त्यानंतर हे आंदोलन अधिकच आक्रमकपणे सुरु झालं. बांगलादेशात शेख हसीना या राजीनामा देत भारतात आल्या आहेत. तर तिकडे अजूनही आंदोलन थांबण्याचं नाव घेतलं जात नाही. यादरम्यान हिंदूंवरही हल्ले होत आहेत.

पंतप्रधान मोदींशी फोनवरुन संवाद
बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नैतृत्वात हंगामी सरकार स्थापन झालं आहे. त्यानंतर धुरा हाती घेतल्यानंतर आंदोलन थांबवण्यासाठी मोहम्मद युनुस यांचे प्रयत्न सुरु आहेत. बांगलादेशात हिंदुंवर अत्याचार होऊ नये, त्यांच्यावर हल्ले होऊ नये यासाठी मोहम्मद युनूस हे काळजी घेत असून हल्लेखोरांवर कडक कारवाई केली जातआहे. याच धर्तीवर युनूस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला
हिंदुंच्या रक्षणाचं आश्वासन
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यांना त्यांच्या देशातील हिंदूंसह सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची आणि सुरक्षिततेची हमी दिली. युनूस यांनी पीएम मोदींशी बराच वेळ चर्चा केली, याची अधिकृत माहिती पंतप्रधानांकडून सोशल मीडियाद्वारे देण्यात आली.
Received a telephone call from Professor Muhammad Yunus, @ChiefAdviserGoB. Exchanged views on the prevailing situation. Reiterated India's support for a democratic, stable, peaceful and progressive Bangladesh. He assured protection, safety and security of Hindus and all…
— Narendra Modi (@narendramodi) August 16, 2024
पीएम मोदींची सोशल मीडियावर पोस्ट
पीएम नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा कॉल बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी केला होता. सद्यस्थितीवर विचार विनिमय झाला. लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांगलादेशासाठी भारताच्या समर्थनाचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्यांनी बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.
काय घडल्या घडामोडी..?
बांगलादेशातील शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर आणि सत्तापालट झाल्यानंतर, मोहम्मद युनूस यांनी 8 ऑगस्ट रोजी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून शपथ घेतली. युनूस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आणि बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेची खात्री करण्याचे आवाहन केले.
गुरुवारी, भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, पंतप्रधान मोदी यांनी हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील परिस्थिती लवकरच सामान्य होईल अशी आशा व्यक्त केली होती. शेजारील देशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत 140 कोटी भारतीय चिंतेत असल्याचे ते म्हणाले होते.
मोहम्मद युनूस ढाकेश्वरी मंदिरात हिंदूंना भेटले
तत्पूर्वी, बांगलादेशमध्ये हिंदूंविरुद्ध सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी ढाकेश्वरी मंदिरात हिंदूंची भेट घेतली. त्यांनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या सुरक्षेबाबत सरकार जागरूक असल्याचे आश्वासन दिले. मोहम्मद युनूस यांनी आंदोलक हिंदू विद्यार्थ्यांचीही भेट घेतली आणि त्यांच्या 8 कलमी मागण्यांवर चर्चा केली. ढाका येथे बुधवारी हिंदूंनी आपल्या मागण्यांसाठी निदर्शने केली होती. युनूस यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की सरकार अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करत आहे.
278 ठिकाणी अल्पसंख्याक समाजावर हल्ले
शेख हसीना सरकार पडल्यानंतर बांगलादेशमध्ये हिंदू समुदायाच्या सदस्यांविरुद्ध हिंसाचार वाढला आहे. बांगलादेश नॅशनल हिंदू ग्रँड अलायन्स, एक गैर-राजकीय हिंदू संघटनेने दावा केला आहे की 5 ऑगस्ट रोजी शेख हसीनाच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर अल्पसंख्याक समुदायाला 48 जिल्ह्यांतील 278 ठिकाणी हल्ले आणि धमक्यांचा सामना करावा लागला आहे.












Click it and Unblock the Notifications