मोठी बातमी! जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला! 5 जवान जखमी
जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरुच असून गांदरबल जिल्ह्यात आज सकाळी एका मजुरावर गोळ्या झाडल्यानंतर पुन्हा काही तासानंतर लष्करी वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 5 जवान जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, उत्तर काश्मीरच्या गुलमर्गच्या बोटापथेर भागात आज दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हा हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर जखमी जवानांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात एका मजुरावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला प्रीतम सिंग हा गोळीबारात जखमी झाला होता. यानंतर काही तासातच लष्करी वाहनावर हल्ल्याची घटना घडली आहे.
दहशतवाद्यांकडून गुलमर्ग, गांदरबल लक्ष्य
जम्मू काश्मीरात निवडणुका घोषित झाल्यानंतर आणि निवडणुका पार पडल्यानंतरच्या काळात दहशतवादी हल्ले झाले आहेत. मतदान आणि मतमोजणी काळात हे हल्ले झाले नाहीत, पण इतर काळात झालेले हे हल्ले चिंताजनक आहेत. दहशतवाद्यांकडून सातत्याने गांदरबल आणि आता गुरमर्ग भागात हल्ले होत आहेत. यामुळे येथील नागरिकांना दहशताद्यांच्या हल्ल्यांचा वारंवार सामना करावा लागत आहे.
अनेक जिल्ह्यात छापे
नॅशनल काॅन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन दहशतवादी हल्ले झाले आहेत. तत्पुर्वी लष्कराने हल्ल्याच्या एका दिवसानंतर, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकून तेहरिक लबाइक या मुस्लिम नावाचा नव्याने तयार झालेला दहशतवादी गट उद्ध्वस्त करण्यात आला.
श्रीनगर, गांदरबल, बांदीपोरा, कुलगाम, बडगाम, अनंतनाग आणि पुलवामा या जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक उद्दिष्ट TLM मधील भरती मॉड्यूल निष्फळ करणे हे होते जे तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये भरती करण्यात सक्रियपणे सहभागी होते.
7 दिवसांत 3 हल्ले, 8 जणांचा मृत्यू
याआधी 20 ऑक्टोबरच्या रात्री जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये झालेल्या हल्ल्यात काश्मीरमधील एक डॉक्टर, मध्यप्रदेशातील एक अभियंता आणि पंजाब आणि बिहारमधील 5 मजुरांना आपला जीव गमवावा लागला होता. याची जबाबदारी लष्करच्या द रेझिस्टन्स फ्रंट अर्थात टीआरएफ या संघटनेने घेतली आहे. बुधवारी या हल्ल्यात दहशतवादी सहभागी असल्याचा फोटो समोर आला आहे.
या फोटोत हातात AK-47 सारखी रायफल घेतलेला एक दहशतवादी एका इमारतीत शिरताना दिसतो. टीआरएफ प्रमुख शेख सज्जाद गुल हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेले कामगार केंद्र सरकारच्या प्रकल्पावर काम करत होते असे दैनिक भास्करच्या वृत्तात म्हटले आहे.
टीआरएफचा म्होरक्या शेख सज्जाद मास्टरमाइंड!
लश्कर-ए-तोएबाची संघटना असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. रिपोर्ट्सनुसार, टीआरएफने गेल्या दीड वर्षात आपली रणनीती बदलली आहे. पूर्वी TRF काश्मीर पंडितांची टार्गेट किलिंग करत असे. आता ही संघटना बिगर काश्मिरी आणि शीखांना लक्ष्य करत आहे.












Click it and Unblock the Notifications