सत्यपाल मलिकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, म्हणाले- विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुफडासाफ होणार
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा ठरल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी घडामोडींना वेग आला आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. जम्मू- काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेतली आहे. यानंतर सत्यपाल मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
महाविकास आघाडीला माझा पाठिंबा
मुंबईत माध्यमांशी बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा आणि भाजपचा सुफडासाफ होणार आहे, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माझा महाविकास आघाडीला पाठिंबा असेल. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत प्रचार सभांसाठी येणार असल्याचेही मलिक यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राच्या निवडणुकीचे देशाच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम
सत्यपाल मलिक यांनी काल मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान राज्याच्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं होतं. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक देशातील राजकीय परिस्थितीवर परिणाम करेल, असं मलिक म्हणाले. मलिक यांनी हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीवर देखील भाष्य केलं आहे. काँग्रेस हरियाणामध्ये जवळपास 60 जागा जिंकेल. तर भाजप केवळ 20 जागा जिंकेल असं मलिक म्हणाले.
पुलवामा हल्ल्याची चौकशी व्हावी
मलिक यांनी पुलवामा हल्ल्याची चौकशी व्हावी याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, 2019 च्या पुलवामाच्या हल्ल्यात 40 सीआसपीएफ जवानांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची व्यापक चौकशी व्हावला हवी. मी पुलवामा हल्ल्याच्या चौकशीची मागणी करत आहे. आपले जवान कसे मारले गेले हे लोकांना कळलं पाहिजे. जवान शहीद होण्याला कोण जबाबदार आहे? हे लोकांच्या समोर आलं पाहिजे असं मलिक म्हणाले.
भाजपावर निशाणा
पुलवामामध्ये हल्ला झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी भाजपने या घटनेचं राजकीयकरण केले. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग करत असल्याचा आरोप करत लोकांनी मतदान करताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत असे आवाहनही मलिक यांनी केले.
सत्यपाल मलिक कोण आहेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बीजेपी वर निशाणा साधणारे सत्यपाल मलिक हे मेघालयचे राज्यपाल होते मेघालयचे राज्यपाल होण्याआधी मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल राहिले आहेत. त्या आधी त्यांना बिहारचे राज्यपाल बनवण्यात आले होते. ते त्याआधी भाजपचे उपाध्यक्ष राहिले आहेत. सत्यपाल मलिक हे राम मनोहर लोहिया यांच्याकडून प्रेरणा घेऊन राजकारणात आले असे सांगितले जाते. त्यांनी मेरठमधून विद्यार्थी नेता म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली.












Click it and Unblock the Notifications