'झाडू' ज्या समाजाचं प्रतिक मानलं जातं, तोच वाल्मिक समाज केजरीवालांवर नाराज... कारण नेमकं काय?
अरविंद केजरीवाल यांनी 2011 मध्ये अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर आम आदमी पक्षाची स्थापना केली. तेव्हा त्यांनी 'झाडू' हे निवडणूक चिन्ह लाँच करण्यासाठी नवी दिल्लीतील वाल्मिकी कॉम्प्लेक्सची निवड केली होती. आता तेच वाल्मिकी समाजाचे लोक या निवडणुकीत त्याला विरोध करताना दिसत आहेत. यंदा नवी दिल्लीतील विधानसभा जागेवर केजरीवाल यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे माजी खासदार संदीप दीक्षित हे लढत आहेत.

काँग्रेसने लावला जोर
काँग्रेस ज्या ७० जागा लढत आहे, त्यात त्यांनी सर्वाधिक जोर नवी दिल्लीतील याच जागेवर लावला आहे. एकेकाळी आम आदमी पक्षाचा मूळ मतदार असलेल्या वाल्मिकी समाजाची नाराजी मतदानाच्या दिवसापर्यंत कायम राहिल्यास 'आप' समोरील आव्हाने आणखी वाढणार आहेत. रविवारी वाल्मिकी समाज आणि दलित महापंचायतींनीही अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निदर्शने केली. यावेळी लेडी हार्डिंग हॉस्पिटलजवळील आपच्या प्रचार व्हॅनलाही आंदोलकांनी लक्ष्य केले. हे झाल्यानंतर केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने भाजपवर निशाणा साधला आहे. मात्र वाल्मिकी समाजाच्या नेत्यांनी उघडपणे केजरीवाल यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
आपल्याला फसविल्याचा आरोप
वाल्मिकी समाजाचे नेते आशु पोहल यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, 'आमच्या समाजाची लूट झाली आहे. आमच्या बहिणी आणि मुलींना पैसे देण्याचे सांगून त्यांना खोटे आश्वासन दिले गेले. ज्यांना आमचा समाज साथ देत नाही त्यांना आम्ही पाठिंबा देणार नाही. आम्ही त्यांच्यावर बहिष्कार टाकू. संपूर्ण देशाला माहित आहे की अरविंद केजरीवाल बनावट मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांना सोडणार नाही, कारण त्यांनी आमच्या दलित समाजाला दुखावले आहे. दिल्लीत प्रदूषण फक्त अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीमुळे वाढले आहे.' एवढेच नाही तर वाल्मिकी समाजाच्या या नेत्याचा दावा आहे की, दिल्लीच्या शिक्षण विभागाने वाल्मिकी समाजाच्या 100 विद्यार्थ्यांना परदेशात पाठवण्याचे आश्वासन दिले होते, पण तेही पूर्ण झाले नाही.
तरुणांमध्येही आहे नाराजी
वाल्मिकी वस्तीमध्ये तरुणांपुढे बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. केजरीवाल यांनी आपल्या मुलांना नोकऱ्या न दिल्याने ही येथील झोपडपट्टी आणि दलित वस्त्यांमध्ये नाराजी कायम आहे. केजरीवाल हे तीनवेळा दिल्लीचे मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल दलितांच्या एका वर्गात निराशा आहे.
भाजपने साधली संधी
तालकटोरा स्टेडियमला 'भगवान महर्षी वाल्मिकी' असे नाव देण्याचे आश्वासन भाजप उमेदवाराने दिले आहे. वाल्मिकी समाजाची केजरीवाल यांच्या विरोधात नाराजी लक्षात घेऊन भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनीही जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. ८ फेब्रुवारीनंतर तालकटोरा स्टेडियमला महर्षी वाल्मिकी यांचे नाव देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी सोमवारी दिले. ते म्हणाले, 'आज मी जाहीर करतो की 8 फेब्रुवारीनंतरNDMC ची बैठक होईल तेव्हा या स्टेडियमला 'भगवान महर्षी वाल्मिकी' असे नाव देण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल. तो पास केला जाईल.
यावेळी नवी दिल्ली विधानसभेसाठी 1.9 लाख मतदार मतदान करणार आहेत. ज्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूपासून मोठ्या संख्येने वाल्मिकी बस्ती आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या दलित मतदारांचा समावेश आहे. परंतु, गेल्या वेळेच्या तुलनेत या जागेवर 36,800 किंवा 25.3% मतदारांनी घट झाली असून, केजरीवाल यांच्या चौथ्या विजयासाठी हे सर्वात मोठे आव्हान आहे.












Click it and Unblock the Notifications