माझ्या जीवाला धोका, राहुल गांधींचे कोर्टात विधान; महात्मा गांधी हत्या, व्होट चोरी ते यांच्यावर आरोप!
Rahul Gandhi life threat : 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे, अशी धक्कादायक माहिती लेखी स्वरुपात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात दिली.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध पुण्यातील विशेष खासदार-आमदार न्यायालयात मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी ही माहिती लेखी स्वरुपात न्यायालयात दिली. त्यात राहुल गांधी म्हटले आहे की, 'माझ्या जीवाला धोका आहे आणि इतिहासाची पुनरावृत्ती होऊ देऊ नये'. त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येचा संदर्भ देत आपल्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

राहुल गांधींनी व्यक्त केली सुरक्षिततेची चिंता
राहुल गांधींच्या मते, सध्याच्या राजकीय संघर्षांमुळे प्रामुख्याने मतचोरीच्या प्रकरणामुळे आणि तक्रारदार सात्यकी सावरकर यांच्या कौटुंबिक संबंधांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या खटल्याची सुनावणी निष्पक्षपणे व्हावी आणि माझ्या जीवाला धोका पोहोचू नये यासाठी न्यायालयाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली.
राहुल गांधींनी कोर्टाला सांगितले की, 'तक्रारदार सात्यकी सावरकर यांनी स्वतःला नथुराम गोडसे यांचा वंशज असल्याचे म्हटले आहे. या वंशाचा संबंध हिंसक विचारसरणीशी आहे, त्यामुळे मला धोका आहे.
या पार्श्वभूमीवर, माझ्यावर हल्ला होण्याची किंवा खोटे आरोप लावण्याची भीती आहे.' म्हणूनच, त्यांनी न्यायालयाकडे 'प्रतिबंधात्मक संरक्षणा'ची म्हणजेच आगाऊ संरक्षणाची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांचे जीवन आणि खटल्याची निष्पक्षता दोन्ही सुरक्षित राहतील.

नेमके काय आहे हे प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण मार्च 2023 मध्ये लंडन येथे राहुल गांधी यांनी केलेल्या एका भाषणाशी संबंधित आहे. या भाषणात त्यांनी सावरकरांबद्दलच्या एका घटनेचा उल्लेख केला होता, ज्यावर सात्यकी सावरकर यांनी आक्षेप घेतला.
राहुल गांधींनी आपल्या भाषणात म्हटले होते की, सावरकरांनी एका पुस्तकात लिहिले आहे की ते एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करत होते आणि या घटनेमुळे त्यांना आनंद झाला होता. सात्यकी सावरकर यांच्या मते, हे विधान खोटे असून, त्यातून सावरकरांची मानहानी झाली आहे.
राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, तक्रारदार सात्यकी यांचे सावरकर आणि गोडसे यांच्या कुटुंबाशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे ते या प्रकरणात आपल्या प्रभावाचा गैरवापर करू शकतात. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 10 सप्टेंबर रोजी होणार आहे.
या मुद्द्यांचा उल्लेख करत म्हटले जीवाला धोका!
राहुल गांधी यांनी अलीकडेच केलेल्या काही विधानांमुळे त्यांना भाजप नेत्यांकडून धमक्या मिळाल्या होत्या. 'मत चोर सरकार', निवडणूक गैरव्यवहार आणि 'खरा हिंदू हिंसक नसतो' यांसारख्या विधानांचा उल्लेख करून त्यांनी आपल्या सुरक्षिततेबाबत अधिक चिंता व्यक्त केली आहे.












Click it and Unblock the Notifications