"भाजपच्या चष्म्यातून संघाकडे पाहणे ही मोठी चूक"; मोहन भागवतांचे विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर!
Mohan Bhagwat RSS statement : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या कार्यपद्धतीवर आणि विचारधारेवर भाष्य करताना विरोधकांना आणि समीक्षकांना सडेतोड उत्तर दिले आहे. "भाजपच्या चष्म्यातून संघाकडे पाहणे ही एक गंभीर चूक आहे. संघ समजून घेण्यासाठी तो स्वतः अनुभवावा लागतो," अशा शब्दांत त्यांनी संघाची स्वायत्तता आणि मूळ उद्देश स्पष्ट केला.
संघाच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त कोलकात्यात आयोजित एका विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदू समाज, राजकारण आणि संघाच्या शिस्तीवर सविस्तर मांडणी केली.

भाजपच्या चष्म्यातून संघाला पाहू नका
मोहन भागवत म्हणाले की, अनेक लोक संघाची ओळख केवळ भारतीय जनता पक्षाशी जोडून पाहतात. जर तुम्ही भाजपच्या चष्म्यातून आरएसएसकडे पाहत असाल, तर तुम्ही कधीच संघ समजू शकणार नाही.
आरएसएस ही केवळ एक सेवा संस्था नाही किंवा केवळ राजकीय बॅकअप देणारी यंत्रणा नाही. संघाचा आवाका मोठा असून तो समजून घेण्यासाठी तुम्हाला त्यात सहभागी होऊन अनुभव घ्यावा लागेल."
व्यायाम म्हणजे हल्ला करण्याची तयारी नव्हे
संघाच्या शाखांमध्ये होणाऱ्या शारीरिक प्रशिक्षणावरून अनेकदा टीका केली जाते. त्याला उत्तर देताना भागवत यांनी एक सोपे उदाहरण दिले.
ते म्हणाले, "आरएसएसचे उद्दिष्ट हिंदू समाजाला संघटित करणे आहे, कोणाचा विरोध करणे नाही. जर एखादी व्यक्ती रोज व्यायाम करत असेल, तर त्याचा अर्थ असा होत नाही की ती कोणावर तरी हल्ला करण्याची योजना आखत आहे. ती व्यक्ती फक्त स्वतःला तंदुरुस्त आणि सक्षम ठेवत आहे. संघ हेच कार्य समाजासाठी करत आहे."
'सत्ते'पेक्षा 'सत्य' महत्त्वाचे
काही काळापूर्वी राहुल गांधी यांनी जर्मनीतील एका दौऱ्यात संघावर टीका करताना म्हटले होते की, "आरएसएस प्रमुखांच्या मते सत्यापेक्षा सत्ता महत्त्वाची आहे."
या विधानाचा अप्रत्यक्ष संदर्भ घेत भागवत यांनी स्पष्ट केले की, संघाची स्थापना कोणत्याही राजकीय हेतूने किंवा सत्तेच्या लालसेपोटी झालेली नाही. संघासाठी भारताची मूल्ये, चारित्र्य आणि हिंदू संघटन हेच सर्वोच्च सत्य आहे.
निमलष्करी दल नव्हे, तर स्वयंशिस्त
संघाच्या गणवेशावर आणि संचलनावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, "आम्ही गणवेशात मार्च करतो, याचा अर्थ आम्ही निमलष्करी दल आहोत असा होत नाही. जगात संघासारखी दुसरी कोणतीही संघटना नाही, त्यामुळे तुलना करणे नेहमीच दिशाभूल करणारे ठरते. संघ हा पूर्णपणे स्वयंशिस्तीवर आधारलेला समाजघटक आहे."
भारताची जबाबदारी हिंदूंच्या खांद्यावर
हिंदू समाजाच्या भूमिकेवर बोलताना सरसंघचालकांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, भारत हा केवळ एक भूभाग नाही, तर ती एक महान परंपरा आणि जीवनशैली आहे. या देशात काहीही चांगले किंवा वाईट घडले, तर त्याचे उत्तरदायित्व हिंदू समाजाकडेच असते. जे स्वतःला हिंदू मानत नाहीत, त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही. मात्र, जे अभिमानाने स्वतःला 'हिंदू' म्हणतात, त्यांना देश कल्याणासाठी त्यांनी काय केले, याचे उत्तर द्यावेच लागेल.












Click it and Unblock the Notifications