महिलांना 2500 रुपये 450 रुपयांत गॅस सिलिंडर! सायलेंट पिरिअडमध्ये काँग्रेसचा जाहिरनामा; आयोगाकडून दखल
Jharkhand News : झारखंड विधानसभा निवडणूक ही दोन टप्प्यात होत आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. मात्र त्याआधीच काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराची वेळ संपल्यानंतर काँग्रेसने आपला जाहिरनामा प्रसिद्ध केल्याने वाद वाढला आहे. हा प्रकार म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचे झारखंड निवडणूक आयोगानेही मान्य केले आहे. त्यामुळे काँग्रेसवर काही कारवाई होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसने मंगळवारी प्रसिद्ध केला जाहिरनामा
झारखंडमध्ये 20 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुका गेल्या बुधवारी झाल्या. म्हणजेच तेथे सध्या सायलेंट पिरिअड सुरु आहे. अशा वेळी आपल्या पक्षाचा जाहिरनामा प्रसिद्ध करता येत नाही. मात्र काँग्रेसने मंगळवारी सायंकाळी आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला. यात झारखंडवासियांना सात मोठी आश्वासने देण्यात आली. त्यात महिलांना अडीच हजार रुपये, फक्त 450 रुपयांत गँस सिलेंडर, प्रत्येक व्यक्तीला सात किलो रेशन, 10 लाख नोकऱ्या आणि 15 लाखांपर्यंत आरोग्य विमा या घोषणांचा समावेश होता.

भाजपने केली होती टिका
प्रचाराची वेळ संपल्यानंतर हा जाहिरनामा प्रसिद्ध झाल्याने त्यावर भाजपने आक्षेप घेतला. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनी काँग्रेसने संविधान व निवडणूक नियमांचे उल्लंघन केले असा आरोप केला. मतदानाच्या आधी 48 तास सायलेंट रिपिअड असतो, असे पात्रांनी म्हटले होते. काँग्रेस वारंवार निवडणूक नियमांचे उल्लंघन करतेय, असा आरोपही त्यांनी केला होता.
राहुल गांधींवरही केली टिका
निवडणुकीआधी 48 तास कोणत्याही राजकीय पक्षाला प्रचार करता येत नाही, असा नियम आहे. पण या नियमांना काँग्रेसने व त्यांचे नेते राहुल गांधींनी हरताल फासला. कोणताही बडा नेता या काळात ना प्रचारसभा घेऊ शकतो, ना जाहिरनामा प्रसिद्ध करु शकतो. मात्र काँग्रेस अशा नियमांचे उल्लंघन वारंवार करते असा पात्रा यांचे म्हणणे होते. त्यानंतर निवडणूक आयोगानेही या प्रकाराची दखल घेतली असल्याची माहिती आहे. आता निवडणूक आयोग या प्रकरणात काय निकाल देते, हे पहाणे मनोरंजक ठरणार आहे.
काँग्रेसने केली पाठराखण
भाजपने केलेले आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी खोडून काढले. आम्ही आमचे घोषणापत्र आमच्या सहयोगी पार्टीसोबत यापूर्वीच प्रसिद्ध केले होते. फक्त आम्ही काँग्रेसकडून स्वतंत्र घोषणापत्र दिले. त्यात काही नियमांचे उल्लंघन झालेले नाही. काँग्रेसचे नेते गुलाम अहमद मीर यांनीही याबाबत भाष्य केले. ते म्हणाले, निवडणुकीची घोषणा आणि प्रत्यक्ष मतदान यांच्या मधल्या वेळेत कधीही घोषणापत्र प्रसिद्ध केले जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदीही एका राज्यातील एका भागाचं मतदान सुरु असताना राज्याच्या दुसऱ्या भागात भाषण देत होते.












Click it and Unblock the Notifications