मोठी बातमी- गोवा: शिरगावमध्ये श्री लैराई जत्रेदरम्यान चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू,30 हून अधिक जखमी
गोव्यातील शिरगाव येथे श्री लैराई देवीच्या जत्रेत मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आणि 30 हून अधिक भाविक जखमी झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मध्यरात्री हजारो भाविक लैराई देवीच्या दर्शनासाठी आणि जत्रेतील विधींसाठी जमले होते. या दुर्घटनेने संपूर्ण गोवा हादरून गेले असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
श्री लैराई जत्रा ही गोव्यातील शिरगाव येथे दरवर्षी आयोजित होणारी एक प्रसिद्ध धार्मिक यात्रा आहे. ही यात्रा पाच दिवस चालते. या जत्रेत गोव्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविक सहभागी होतात.

भाविक या काळात उपवास करतात आणि "हर हर महादेव" आणि "लैराई माता की जय" अशा घोषणा देत देवीचे दर्शन घेतात. यंदा ही जत्रा 2 मे रोजी सुरू झाली होती आणि पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती. या जत्रेसाठी प्रशासनाने मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती, ज्यामध्ये ड्रोन आणि सुमारे 400 पोलिसांचा समावेश होता. तरीही, मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास अचानक चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे हा अपघात घडला आहे.
6 dead and more than 15 injured in a stampede that occurred at the Lairai Devi temple in Shrigao, Goa: North Goa SP Akshat Kaushal
— ANI (@ANI) May 3, 2025
More details awaited
चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये दोन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. याशिवाय 30 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी), मापुसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय आणि बिचोलीम प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने जत्रेचा उत्साह मावळला असून भाविकांमध्ये शोक आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
या चेंगराचेंगरीची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. परंतु प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्रीच्या विधींदरम्यान भाविकांची प्रचंड गर्दी आणि व्यवस्थेचा अभाव यामुळे ही दुर्घटना घडली. जत्रेत दरवर्षी हजारो भाविक येत असल्याने गर्दी नियंत्रण हा नेहमीच एक आव्हानात्मक मुद्दा राहिला आहे. तरीही, मध्यरात्रीच्या सुमारास विधींदरम्यान अचानक गोंधळ उडाला त्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.












Click it and Unblock the Notifications