Ankita Bhandari Murder Case : 500 पानी दोषारोपपत्र अन् कोर्टाने तिन्ही आरोपींना दिली मोठी शिक्षा
Ankita Bhandari Murder Case : उत्तराखंडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या अंकिता भंडारी हत्या प्रकरणात न्यायालयाने आज आपला निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने या प्रकरणातील तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयाने पुलकित आर्य, सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता या तिन्ही आरोपींना दोषी ठरवले.

नेमकं प्रकरण काय आहे?
2022 मध्ये सदर हत्येची घटना घडली होती. ऋषिकेशजवळील वंतारा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या 19 वर्षीय अंकिता हिला सप्टेंबर 2022 मध्ये रिसॉर्ट ऑपरेटर पुलकित आर्य आणि इतर दोन कर्मचाऱ्यांनी चिला कालव्यात ढकलून दिल्याचा आरोप झाला. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की अंकिताने रिसॉर्टमधील एका 'व्हीआयपी' पाहुण्याला 'अतिरिक्त सेवा' देण्यास नकार दिला होता आणि त्यातून उद्भवलेल्या वादातून तिची हत्या करण्यात आली. भाजपच्या माजी नेत्याचा मुलगा आर्य आणि इतर दोन आरोपी - अंकित गुप्ता आणि सौरभ भास्कर सध्या तुरुंगात आहेत.
दरम्यान, तीन वर्षे जुन्या या प्रकरणात, केवळ उत्तराखंडच नाही तर संपूर्ण देशाची नजर न्यायालयाच्या या निर्णयाकडे लागलेली होती. सुनावणीदरम्यान, पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालयाच्या परिसराचा 200 मीटरचा परिसर सील केला. फक्त वकील, प्रकरणाशी संबंधित पक्षकार आणि आवश्यक कर्मचाऱ्यांना आत जाण्याची परवानगी होती. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे.
एसआयटी स्थापना, 500 पानी दोषारोषपत्र अन् निकाल..
पुलकित आर्य याच्यावर आयपीसीच्या कलम 302 (खून), 201 (पुरावे नष्ट करणे), 354A (छेडछाड) आणि अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. एसआयटीच्या वतीने 500 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
यामध्ये 97 साक्षीदारांची नावे होती, त्यापैकी 47 साक्षीदार सरकारी वकिलांनी सादर केले होते. अंकिता रिसॉर्टमधून गायब झाली होती. ऋषिकेशजवळील वंतारा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणारी 19 वर्षीय अंकिता 18 सप्टेंबर 2022 रोजी अचानक बेपत्ता झाली. पाच दिवसांनी, 24 सप्टेंबर रोजी, ऋषिकेशजवळील चिल्ला कालव्यातून अंकिताचा मृतदेह सापडला. ही बाब उघडकीस आल्यानंतर, रिसॉर्ट मालक पुलकित आर्य यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, पोलिसांनी चौकशी अंती तिन्ही आरोपींना अटक केली होती. तर आज तीन वर्षानंतर या घटनेचा निकाल न्यायालयाने दिला आहे. सर्व आरोपींना दोषी मानत त्यांना जन्पठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.












Click it and Unblock the Notifications