मोठी बातमी: कॉमेडियन कपिल शर्माच्या 'कॅप्स कॅफे'वर तिसऱ्यांदा गोळीबार; लॉरेन्स टोळीची उघड धमकी!
Kapil Sharma Caps Cafe shooting : प्रसिद्ध भारतीय अभिनेता आणि स्टँड-अप कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅनडातील रेस्टॉरंट 'कॅप्स कॅफे'वर पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामधील सरे येथे असलेल्या या कॅफेला लक्ष्य करण्याची ही तिसरी वेळ आहे. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असलेल्या गोल्डी ढिल्लन आणि कुलदीप सिद्धू नेपाली यांनी स्वीकारली आहे.
लॉरेन्स टोळीची धमकी
या गोळीबारानंतर लॉरेन्स टोळीने सोशल मीडियावर एक पोस्ट जारी केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे धमकी दिली आहे आणि हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की: "वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. मी, कुलवीर सिद्धू आणि गोल्डी ढिल्लन आज (सरे येथील कॅप्स कॅफे येथे) झालेल्या तीन गोळीबारांची जबाबदारी घेतो.
आमचे सर्वसामान्य लोकांशी कोणतेही वैर नाही. ज्यांच्याशी आमचे वाद आहे त्यांनी आमच्यापासून दूर राहावे. जे बेकायदेशीर काम करतात आणि लोकांना पैसे देत नाहीत त्यांनीही तयार राहावे. बॉलीवूडमध्ये धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांनीही तयार राहावे. गोळ्या कुठूनही येऊ शकतात. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह." या धमकीमुळे केवळ कपिल शर्माच्या व्यवसायावरच नाही, तर बॉलीवूडमधील व्यक्तींच्या सुरक्षिततेवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कॅप्स कॅफेवरील हल्ल्यांची मालिका
या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यातही या कॅफेवर गोळीबार झाले होते. ऑगस्टमध्ये झालेल्या गोळीबारात कॅफेच्या खिडक्यांमध्ये सहा गोळ्यांची छिद्रे आणि काचा तुटलेल्या दिसल्या होत्या. पहिल्या हल्ल्यात हल्लेखोरांनी कॅफेवर नऊ राऊंड गोळीबार केला होता, त्यावेळी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डी याने हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.

वादाची नेमकी पार्श्वभूमी काय?
निहंग शिखांबाबत कपिल शर्माची नेमकी कोणती टिप्पणी होती, हे स्पष्ट नाही. मात्र, काही सूत्रांनुसार, ही टिप्पणी जुन्या नेटफ्लिक्स एपिसोडशी किंवा लाईव्ह शोशी संबंधित असू शकते. या वर्षाच्या सुरुवातीला निहंग नेते बाबा बलबीर सिंग यांनीही कपिल शर्माच्या कॉमेडी मजकुरावर आक्षेप घेतला होता.
घाबरणार नाही: कपिल शर्माची भूमिका
पहिल्या हल्ल्यानंतर कपिल शर्माने सरेचे महापौर ब्रेंडा लॉक आणि पोलिसांचे आभार मानले होते. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते, "आम्हाला प्रेम आणि पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार. हिंसेविरुद्ध आम्ही एकजुटीने उभे आहोत." कपिलने स्पष्ट केले होते की तो आणि त्याचे कुटुंब घाबरणार नाही आणि शांतता तसेच सुरक्षिततेसाठी ठामपणे उभे राहतील. कपिलच्या याच विधानामुळे टोळी अधिक संतप्त झाली आणि त्यानंतर गोळीबाराचे दावे करण्यात आले.












Click it and Unblock the Notifications