'बारामतीचा सुपुत्र' जाता-जाता सिनेसृष्टीला देऊन गेला मोठी 'भेट'; नाशिकसाठी अजित दादांचे मोलाचे कार्य
Ajit Pawar's Gift to Cinema :"अजित दादा म्हणजे केवळ कडक शिस्तीचे प्रशासन आणि रोखठोक राजकारण नव्हतं, तर त्यांच्यात एक कलाप्रेमी 'पुत्र'ही दडलेला होता. आपल्या वडिलांनी पाहिलेलं सिनेसृष्टीचं स्वप्न त्यांनी 'इगतपुरी फिल्म सिटी'च्या रूपाने प्रत्यक्षात उतरवलं. आज दादा पंचतत्वात विलीन झाले असले तरी, महाराष्ट्राच्या चंदेरी दुनियेला दिलेली ही भेट त्यांचे नाव सदैव अमर ठेवेल."

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ विमान अपघातात २८ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले. गुरुवारी २९ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे शोकाकुल वातावरणात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या 'दादां'ना निरोप देण्यासाठी जनसागर लोटला असतानाच, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या एका महत्त्वाच्या निर्णयाबद्दल सिनेसृष्टीत बोलले जात आहे.
नाशिकसाठी दिली भेट
राजकारणात दबदबा असणाऱ्या अजित पवारांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीसाठी 'नाशिक फिल्म सिटी'ची मोठी सौगात दिली होती, जी आता त्यांच्या कार्याची जिवंत साक्ष ठरणार आहे.
अंत्यसंस्कारात सिनेसृष्टी आणि राजकीय दिग्गजांची हजेरी
अजित पवारांचे पार्थिव पंचतत्वात विलीन होताना त्यांचे दोन्ही पुत्र जय पवार आणि पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिला. यावेळी राजकीय दिग्गजांसोबतच चित्रपटसृष्टीतील मान्यवरही उपस्थित होते. अभिनेता रितेश देशमुख अत्यंत भावूक अवस्थेत दिसला, तर आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश यांनीही त्यांना आदरांजली वाहिली.
वडिलांचा वारसा आणि 'राजकमल स्टुडिओ'
अजित पवारांचे सिनेसृष्टीशी असलेले नाते खूप जुने होते. त्यांचे वडील अनंतराव पवार यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्यासोबत मुंबईतील ऐतिहासिक 'राजकमल स्टुडिओ' मध्ये असिस्टंट सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले होते. 'झनक झनक पायल बाजे' आणि 'अमर भूपाली' सारख्या अजरामर चित्रपटांच्या निर्मितीत त्यांच्या वडिलांचा तांत्रिक वाटा होता. वडिलांचे हेच सिनेसृष्टीचे प्रेम अजित दादांच्या मनातही कुठेतरी जिवंत होते.
अजित पवारांची शेवटची मोठी भेट: नाशिक-इगतपुरी फिल्म सिटी
ऑक्टोबर २०२५ मध्ये अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारतर्फे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे एका भव्य फिल्म सिटीच्या निर्मितीला मंजुरी दिली होती. या प्रकल्पामागे दादांचे तीन मोठे उद्देश होते.
- मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीवरील ताण कमी करणे.
- नाशिक आणि इगतपुरीमधील स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळवून देणे.
- इगतपुरीच्या नैसर्गिक सौंदर्याचा वापर करून पर्यटनाला आणि हॉटेल व्यवसायाला चालना देणे.
मुंबईपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेल्या या फिल्म सिटीमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात मोठी भर पडणार आहे. ही फिल्म सिटी आता अजित पवारांच्या 'व्हिजनरी' नेतृत्वाची कायम आठवण करून देईल.












Click it and Unblock the Notifications