युवकांची बल्ले बल्ले, बघा तरुणांना बजेटमधून काय मिळालं?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. अंतरिम अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे या अर्थसंकल्पात ९ घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.
त्यात शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास आणि नव्या पीढीतील सुधारणा या मुद्द्यांचा समावेश आहे.

सुरुवातीला अर्थमंत्र्यांनी शेतीबाबतच्या संकल्पांचा आढावा घेतला व आता युवकांच्या रोजगार व कौशल्यावर आधारित योजनांबाबत मोठ्या घोषणा केल्या.
देशात 20 लाख युवकांना प्रशिक्षण
देशात ५० लाख अतिरिक्त रोजगार निर्माण केला जाईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. कौशल्य विकासासाठी केंद्र सरकारची नवीन योजनाही जाहीर करण्यात आली. त्यात राज्य सरकार व उद्योगविश्वासोबत ही योजना राबवली जाणार आहे. त्यात ५ वर्षांच्या काळात २० लाख युवकांना कौशल्यविकास प्रशिक्षण दिलं जाईल.
या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम उद्योगविश्वाच्या गरजांनुसार तयार केला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बिहारमध्ये नव्या विद्यापीठाची घोषणा केली आहे. तसेच, अमृतसर-कोलकाता मार्गावर उद्योग कॉरिडोअर उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. विकास भी, विरासत भी या तत्वावर हे कॉरिडोर उभारलं जाणार आहे.
प्रतिमहिना पाच हजार स्टायपेंड
देशातील ५०० अग्रणी कंपन्यांमध्ये तरुणांना किमान कौशल्याचं शिक्षण देत इटर्नशिप करता येणार आहे. पुढच्या पाच वर्षांत जवळपास १ कोटी तरुणांना याचा फायदा होईल. १२ महिन्यांपर्यंत या तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येईल. त्याशिवाय प्रतिमहिना ५ हजार रुपये आणि वर्षभरात ६० हजार रुपये प्रशिक्षणार्थींना दिले जाणार आहेत.
कंपन्यांनी या उमेदवारांच्या प्रशिक्षणाचा आणि त्यांच्या इंटर्नशिप भत्त्यातील १० टक्के खर्च त्यांच्या सीएसआर निधीतून करावा, असंही अर्थमंत्र्यांनी सुचवलं आहे. याशिवाय देशभरात १२ इंडस्ट्रियल पार्कला नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रॅमअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications