Iran israel war impact : इराण-इस्रायल युद्धाचा 'भारताच्या 'या' 5 गोष्टींवर परिणाम, महागाईचे संकट
Iran israel war impact on india imports exports : "इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा वणवा आता केवळ क्षेपणास्त्रांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो जागतिक व्यापाराच्या मुख्य नाड्यांनाही आवळू लागला आहे. ज्या मार्गाने भारताची बहुतांश आयात-निर्यात चालते, तो 'होर्मुजची सामुद्रधुनी' हा समुद्री मार्ग युद्धाच्या केंद्रस्थानी आल्याने भारतात महागाईचा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे. परदेशातून येणाऱ्या डाळींपासून ते भारताचा सुगंधी बासमती तांदूळ आणि कापडाच्या निर्यातीपर्यंत सर्वच ठिकाणी युद्धाचे सावट दिसत आहे. मीडिया रिपोर्ट, तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, तुमचे घरगुती बजेट आणि देशाचा व्यापार यावर या युद्धाचा काय परिणाम होणार? हे जाणून घेऊया.

१. आयात क्षेत्रावर परिणाम: डाळी आणि खाद्यतेल महागणार?
- भारत आपल्या गरजेच्या डाळी आणि खाद्यतेलासाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे.
- डाळींचे दर वाढणार: भारत दरवर्षी सुमारे ५०-६० लाख टन डाळी (तूर, उडीद आणि मसूर) कॅनडा, म्यानमार आणि आफ्रिकन देशांतून आयात करतो. समुद्री मार्गावरील धोक्यामुळे जहाजांचे भाडे आणि विमा (Insurance) महाग झाला आहे. 'ऑल इंडिया दाल मिल असोसिएशन'च्या मते, युद्ध एक आठवड्यापेक्षा जास्त चालल्यास डाळींच्या किमतीत मोठी वाढ होईल.
- खते आणि शेतीवर परिणाम: भारत रशिया आणि आखाती देशांतून खतांची आयात करतो. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने खतांच्या किमती वाढून शेतीचा उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता आहे.
२. निर्यात क्षेत्राला बसणारा फटका
- भारतातून होणारी निर्यात आता महागडी आणि वेळखाऊ झाली आहे.
- बासमती तांदूळ: इराण हा भारतीय बासमती तांदळाचा मोठा खरेदीदार आहे. युद्धाच्या तणावामुळे आणि पेमेंटच्या अनिश्चिततेमुळे तांदूळ निर्यातदारांनी नवीन करार करणे थांबवले आहे.
- कापड आणि इलेक्ट्रॉनिक्स: युरोप आणि अमेरिकेकडे जाणारी भारतीय कापड (Textiles), हिरे-दागिने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात आता लांबच्या मार्गाने (केप ऑफ गुड होप) करावी लागत आहे. यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला असून डिलिव्हरीला विलंब होत आहे.
३. जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्य
कांदा आणि भाजीपाला: इंधन दरात वाढ झाल्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे, ज्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेत कांदा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर झाला आहे.
गॅस (LPG) पुरवठा: भारताचा ५०% पेक्षा जास्त एलपीजी (LPG) पुरवठा याच युद्धग्रस्त भागातून येतो. जर हा मार्ग बंद झाला, तर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीतही वाढ होऊ शकते.
४. सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ
- युद्धामुळे जागतिक गुंतवणूकदार धास्तावले असून त्यांनी आपला पैसा शेअर बाजारातून काढून सोन्यात गुंतवण्यास सुरुवात केली आहे.
- किमतीत मोठी वाढ: भारतात सोने प्रति १० ग्रॅम १.९० लाख ते २ लाख रुपयांच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचण्याची शक्यता आहे.
- सध्याची स्थिती: गेल्या काही दिवसांतच सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम सुमारे ३० हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
- लग्नसराईची चिंता: लग्नसराईच्या हंगामात सोन्याचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या बजेटचे कोलमडले आहे.
५. शेअर बाजारात 'हाहाकार'
- इराणमधील तणावामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली.
- सेन्सेक्सची घसरण: सेन्सेक्समध्ये ९०० पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली असून तो ७८,५४३ च्या पातळीवर पोहोचला आहे.
- निफ्टीमध्ये पडझड: निफ्टी २४,९०० च्या खाली घसरल्याने गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये काही तासांतच स्वाहा झाले आहेत.
६. कच्च्या तेलाचा भडका आणि महागाईचे संकट
भारतासाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे कच्च्या तेलाचा पुरवठा.
पुरवठा साखळी धोक्यात: जगातील २०% तेल वाहतूक ज्या मार्गाने होते, तो 'होर्मुजची सामुद्रधुनी' इराणने बंद करण्याचा इशारा दिला आहे. महत्वाचे म्हणजे भारताचे ४०% पेक्षा जास्त कच्चे तेल याच मार्गाने येते. जर हा मार्ग बंद झाला तर डिझेल आणि पेट्रोलचे दर भारतात मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात तसेच भारताची ऊर्जा सुरक्षा आणि अन्न सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो.
(डिस्क्लेमर: हा अहवाल सद्यस्थितीतील जागतिक घडामोडी आणि बाजार विश्लेषकांच्या अंदाजावर आधारित आहे. परिस्थितीनुसार दरांमध्ये बदल होऊ शकतो.)












Click it and Unblock the Notifications