स्लो बट स्मार्ट..! विराटने पार केला नऊ हजार धावांचा टप्पा, पहा अजून कोण आहे या यादीत...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सध्या सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना बंगळुरुत सुरु आहे. या सामन्यातील तीन दिवसांचा खेळ संपला असून अजून दोन दिवस शिल्लक आहे. सामन्यावर न्यूझीलंडची पकड मजबूत असली तरी भारतीयांसाठी एक आनंदाचा क्षणही आला आहे. विराट कोहलीच्या शिरपेचात आज आणखी एक तुरा रोवला गेला. अर्थात हा तुरा रोवण्यासाठी त्याला इतर भारतीयांपेक्षा जास्त सामने खेळावे लागले. मात्र, अशी किमया करणारा तो गेल्या दहा वर्षातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
विराटने पार केला नऊ हजार धावांचा टप्पा
बंगळुरु कसोटीत तिसऱ्या दिवशी विराट कोहलीने कसोटीत वैयक्तीक नऊ हजार धावांचा पल्ला गाठला. नऊ हजार धावा करण्यासाठी विराटला तब्बल 197 कसोटी डाव खेळावे लागले. विराटपूर्वी भारताच्या सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांनी हा टप्पा पार केला आहे. विराट आता या फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. मात्र या तिघांपेक्षा विराटला नऊ हजार धावा करण्यासाठी जास्त सामने खेळावे लागले. या यादीत राहुल द्रवीड आघाडीवर आहे. द्रवीडने हा पल्ला गाठण्यासाठी 176 डाव घेतले. सचिनने 179 डावांत ही किमया साधली. तर सुनील गावस्कर यांना 192 डाव खेळावे लागले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट चमकला
कसोटी सामन्यांचा विचार करता विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 2,042 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध त्याच्या 1,991 धावा आहेत. त्याचबरोबर दक्षिण अफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. दरम्यान कसोटीत सर्वात कमी डावात 9 हजार धावांचा पल्ला गाठण्याचा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर आहे. त्याने 172 डावात ही किमया साधली आहे. स्टीव्ह स्मिथने 174 डावात, तर राहुल द्रविड आंतरराष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे, विराट कोहली आंतरराष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या स्थानी 15 हजार धावा करणारा पहिला भारतीय ठरला आहे.
न्यूझीलंडकडे 125 धावांची आघाडी
न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्व गडी बाद 402 धावा केल्या. न्यूझीलंडकडे 356 धावांची मजबूत आघाडी होती. भारतीय फलंदाजांनी तिसऱ्या दिवशी चांगली खेळी केली. सलामीच्या यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा या जोडीने चांगली सुरुवात केली. त्यानंतर विराट कोहली आणि सरफराज खान यांची जोडी जमली. या जोडीने 136 धावांची खेळी केली. विराट कोहलीने 70 धावा केल्या आणि दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर विकेट टाकली. तर सरफराज खान नाबाद 70 धावांवर खेळत आहे. भारताने 3 गडी गमवून 231 धावा केल्या आहेत. अजूनही न्यूझीलंडकडे 125 धावांची आघाडी आहे.












Click it and Unblock the Notifications