Tilak Varma : बापरे! तिलक वर्माला झाला होता 'हा' त्रासदायक आजार, ग्लोव्हज काढावे लागले कापून!
Tilak Varma : भारतीय क्रिकेट टीमचा नवीन स्टार आणि आशिया चषकाचा हिरो तिलक वर्मा याने नुकताच आपल्या आयुष्यातील एका अत्यंत गंभीर आरोग्य संकटाबाबत खुलासा केला आहे. क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकार मारणाऱ्या या युवा खेळाडूला एकेकाळी 'मृत्यू' जवळून बघायला लागला होता. त्याला झालेला जीवघेणा आजार म्हणजे Rhabdomyolysis (रॅबडोमायोलिसिस).

काय आहे तिलक वर्माला झालेला आजार?
सन २०२२ मध्ये आयपीएल खेळल्यानंतर तिलक वर्मा फिटनेसच्या ध्यासाने इतका भारावून गेला की त्याने रिकव्हरीकडे दुर्लक्ष केले. गौरव कपूरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' शोमध्ये बोलताना तिलक म्हणाला, "मला जगातील सर्वात फिट खेळाडू आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक बनायचं होतं. विश्रांतीच्या दिवशीही मी जिममध्ये घाम गाळायचो." या अति-ताणामुळे त्यांच्या स्नायूंमध्ये वेगाने तुटफूट सुरू झाली. या गंभीर स्थितीला 'रॅबडोमायोलिसिस' म्हणतात, ज्यात स्नायू तुटून विषारी घटक रक्तात मिसळतात आणि किडनीवर थेट परिणाम करतात.
ग्लोव्हज कापून काढावे लागले!
तो भयानक दिवस आठवताना तिलक म्हणाला, "बांगलादेशमध्ये एका 'ए' मालिकेदरम्यान माझी अवस्था खूप बिघडली." शतक पूर्ण करण्यासाठी जोर लावल्यानंतर त्याचे स्नायू इतके जकडले गेले की त्याला हातातील ग्लोव्हज चक्क कापून काढावे लागले, कारण त्याची बोटे हलूच शकत नव्हती. "माझं शरीर दगडासारखं कडक झालं होतं. मला 'रिटायर हर्ट' व्हावं लागलं."
आकाश अंबानी आणि BCCI 'देवदूत' बनले!
या भयंकर अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा तो क्षण होता, जेव्हा मुंबई इंडियन्सचे सह-मालक आकाश अंबानी आणि बीसीसीआय (BCCI) मदतीला धावून आले.
तिलकने कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले, "मला लगेच आकाश अंबानी यांचा फोन आला. त्यांनी बीसीसीआयशी संपर्क साधला आणि त्यानंतर मला लगेच मदत मिळाली. मी जय शहा सरांचेही आभार मानतो." डॉक्टरांनी स्पष्ट केले होते की, उपचारात काही तासांचा जरी विलंब झाला असता, तरी परिणाम गंभीर झाले असते. रुग्णालयात त्याच्या नसा इतक्या कडक झाल्या होत्या की IV लाईनसाठी लावलेली सुई वारंवार तुटत होती.
अनेक महिने उपचार
अनेक महिने उपचार आणि विश्रांती घेतल्यानंतर तिलक वर्मा पूर्णपणे बरा झाला आणि त्याने IPL 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध ८४ धावांची शानदार नाबाद खेळी करत जोरदार पुनरागमन केले. आज तो भारताच्या टी२० संघाचा महत्त्वाचा भाग आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेत खेळण्यासाठी सज्ज आहे.












Click it and Unblock the Notifications