T20 World Cup : भारताचा विजय अन् धोनीची गंभीरला 'कोच साहिब' अशी खास दाद; 'तो' संवाद व्हायरल!
MS Dhoni and Gautam Gambhir viral post : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी रविवारचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांच्या प्रचंड फरकाने पराभव केला आणि टी२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले.
या ऐतिहासिक विजयानंतर मैदानावर जितका जल्लोष झाला, तितकीच चर्चा आता सोशल मीडियावर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील एका रंजक संवादाची होत आहे.

'कोच साहिब' आणि धोनीची मिश्किल टिप्पणी
भारतीय संघाच्या या यशानंतर एमएस धोनीने सोशल मीडियावर टीम इंडियाचे अभिनंदन करताना गौतम गंभीरचे विशेष कौतुक केले. धोनीने गंभीरला "कोच साहिब" असे संबोधत एक पोस्ट शेअर केली. धोनीने लिहिले की, "तुमचे हास्य खूप छान दिसते; 'गंभीर'ता आणि हास्य हे एक घातक संयोजन आहे." धोनीची ही पोस्ट काही क्षणांतच व्हायरल झाली.
यावर उत्तर देताना गौतम गंभीरनेही चाहत्यांची मने जिंकली. गंभीरने रिप्लाय दिला, "आणि हसण्याचे किती छान कारण आहे! तुम्हाला पाहून खूप आनंद झाला!" २०११ च्या विश्वचषक विजयाचे हे दोन शिल्पकार पुन्हा एकदा अशा प्रकारे संवाद साधताना पाहून क्रिकेटप्रेमी भावूक झाले असून दोघांच्या मैत्रीचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे.
टीम इंडियाचा 'रेकॉर्ड ब्रेक' विजय
भारताने या विजयासोबतच क्रिकेट विश्वात अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत.
जेतेपदाचे रक्षण : 2024 नंतर 2026 मध्येही चषक जिंकून सलग दोनवेळा टी२० विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.
यजमानाचा करिष्मा : घरच्या मैदानावर टी२० विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिलाच संघ बनला आहे.
तिसरा मुकुट : 2007, 2024 आणि 2026 असे एकूण तीनवेळा T-20 विश्वचषक जिंकून भारताने इतिहास रचला आहे.
'हाय रिस्क, हाय रिवॉर्ड': गंभीरचा विजयाचा मंत्र
विजयानंतर 'आज तक'शी बोलताना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघाच्या यशाचे गुपित उघड केले. ते म्हणाले की, "प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळताना मी खेळाडूंना एकच गोष्ट सांगितली होती - टी२० मध्ये 'उच्च जोखीम, उच्च बक्षीस' (High Risk, High Reward) हाच दृष्टिकोन हवा. आमच्या संघाने वैयक्तिक टप्प्यांकडे (Milestones) लक्ष न देता खेळाला प्राधान्य दिले. संपूर्ण स्पर्धेत आम्ही आक्रमक क्रिकेट खेळलो आणि त्याचे फळ आज आपल्यासमोर आहे."
दोन दिग्गज : कारकिर्दीचा आढावा
धोनी आणि गंभीर या जोडीने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत:
गौतम गंभीर: फायनलचा 'मॅन'
पदार्पण : २००३ (एकदिवसीय), २००४ (कसोटी).
मोठे योगदान : २००७ टी२० विश्वचषक फायनलमध्ये ७५ धावा आणि २०११ विश्वचषक फायनलमध्ये ९७ धावांची खेळी करून भारताच्या विजयाचा पाया रचला.
आयपीएल यश : कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) आपल्या नेतृत्वाखाली २०१२ आणि २०१४ मध्ये विजेतेपद मिळवून दिले.
महेंद्रसिंग धोनी: यशस्वी कर्णधार
पदार्पण : २००४ (एकदिवसीय), २००५ (कसोटी).
आयसीसी ट्रॉफींचा राजा : धोनी हा जगातील एकमेव असा कर्णधार आहे ज्याने तिन्ही आयसीसी ट्रॉफी (२००७ टी२० विश्वचषक, २०११ एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकल्या आहेत.
आयपीएल यश : चेन्नई सुपर किंग्सला (CSK) अनेक वेळा चॅम्पियन बनवून आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला.












Click it and Unblock the Notifications