'हा तर निर्लज्जपणाचा कळस..!', ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी BCCIसह मोदींवर का संतापल्या?
Priyanka Chaturvedi on India Pakistan Cricket wcl 2025 : जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या वेदना अजून ताज्या असतानाच, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL-2025) मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंमध्ये होणाऱ्या सामन्यावरून देशात संतापाची लाट उसळली आहे.
एका बाजूला 26 निष्पाप जिवांचे बलिदान आणि 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची देशाची तयारी, तर दुसऱ्या बाजूला क्रिकेटच्या मैदानावर दोन्ही देशांच्या खेळाडूंची 'सामना' खेळण्याची तयारी - हा विरोधाभास अनेकांना खटकत आहे. यावरुन आता शिवसेना (यूबीटी) नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी तर या सामन्याला 'नैतिक दिवाळखोरी' आणि 'निर्लज्जपणा' असे संबोधत सरकार आणि बीसीसीआयवर थेट निशाणा साधला आहे.

पहलगामची जखम, क्रिकेटचा विरोधाभास
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने अवघा देश शोकमग्न आहे. या हल्ल्यातील हुतात्म्यांच्या बलिदानाला न्याय मिळावा आणि पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी जनभावना तीव्र आहे.
अशा गंभीर आणि संवेदनशील परिस्थितीत, निवृत्त क्रिकेटपटूंना एकत्र आणण्यासाठी आयोजित केलेल्या WCL स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे माजी खेळाडू 20 जुलै रोजी एकमेकांविरुद्ध खेळणार असल्याची बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगन सह-मालक असलेल्या या स्पर्धेचा हेतू खेळाडूंचा सन्मान असला तरी, दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत असंवेदनशील मानला जात आहे.
Absolutely shameless! Hello GoI, what happened to no engagement with Pakistan? We dont have the Pahalgam terrorists yet but here we have an Indian side desperate to resume cricket matches with Pakistan. If nothing else atleast think of those families who lost their loved one in… pic.twitter.com/TDFfKB180D
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) July 19, 2025
"शहीदांच्या दुःखापेक्षा खेळ मोठा झाला?"
प्रियांका चतुर्वेदी यांनी या निर्णयावर जोरदार हल्लाबोल चढवला. त्यांच्या मते, हे केवळ 'निर्लज्ज' पणाचा कळसच नाही तर 'नैतिक दिवाळखोरी' आहे. त्यांनी थेट पंतप्रधान मोदींच्या सरकारला आणि बीसीसीआयला प्रश्न विचारला आहे.
"अगदी निर्लज्ज! नमस्ते भारत सरकार, पाकिस्तानशी बोलण्याचे काय झाले नाही? सध्या पहलगामचे दहशतवादी आमच्याकडे नाहीत, पण येथे एक भारतीय संघ आहे जो पाकिस्तानशी क्रिकेट सामने पुन्हा सुरू करण्यास उत्सुक आहे. जर दुसरे काही नसेल तर किमान दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांचा विचार करा. नमस्कार बीसीसीआय आणि आयसीसी - तुम्ही ज्या सूडाची मागणी करत आहात ते तुमची नैतिक दिवाळखोरी दर्शवते."
चतुर्वेदींचा हा हल्ला केवळ सामना किंवा संघावर नाही, तर दहशतवादी हल्ल्यांनंतरही पाकिस्तानशी क्रीडा संबंध सुरू ठेवण्याच्या धोरणावरही आहे. देशाच्या भावना आणि हुतात्म्यांचा आदर यापेक्षा व्यावसायिक खेळाला प्राधान्य का दिले जात आहे, असा त्यांचा प्रश्न आहे.
राष्ट्रीय सुरक्षा विरुद्ध क्रिकेट, प्राधान्य कशाला?
या घटनेमुळे 'खेळ राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या संवेदनशील भावनांपेक्षा मोठा असू शकतो का?' हा मूलभूत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकीकडे भारत 'ऑपरेशन सिंदूर' सारख्या कारवाईने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असताना, त्याच वेळी क्रिकेटच्या मैदानावर दोन्ही देशांचे खेळाडू एकत्र येणे, हे सामान्य नागरिकांना विरोधाभासी वाटत आहे.
राजकीय नेत्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत अनेक जण या सामन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. देशाच्या सुरक्षिततेचा आणि नागरिकांच्या भावनांचा विचार न करता असे व्यावसायिक निर्णय घेतले जात असतील तर, भविष्यात याचे काय परिणाम होतील, यावर विचारमंथन करण्याची वेळ आली आहे. पहलगामच्या जखमांवर अजून मलमपट्टी झाली नसताना, या क्रिकेट सामन्याची बातमी मीठ चोळण्यासारखीच असल्याचे जनमत तयार होताना दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications