T20 वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध मॅच पाकिस्तानचा बहिष्कार! ICC चे उत्तर? काय कारवाई करू शकते? वाचा
Pakistan Boycotts India Match in T20 World Cup 2026 : क्रीडाविश्वातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. आगामी टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पाकिस्तानने सहभागी होण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यांनी भारतासोबतचा सामना खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पाकिस्तान सरकारने रविवारी, १ फेब्रुवारी रोजी या ऐतिहासिक निर्णयाची अधिकृत घोषणा केली. या निर्णयामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली असून आयसीसीच्या (ICC) गोटात चिंतेचे वातावरण आहे.

नेमका वाद काय? का घेतला बहिष्काराचा निर्णय?
पाकिस्तानच्या या आक्रमक पवित्र्यामागे बांगलादेश क्रिकेट संघाचा मुद्दा कारणीभूत आहे. आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढून त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला आहे. बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे सामने भारताबाहेर (उदा. श्रीलंका) घेण्याची मागणी केली होती, जी आयसीसीने फेटाळून लावली. पाकिस्तानचा असा युक्तिवाद आहे की, जर भारताचे काही सामने श्रीलंकेत होऊ शकतात, तर बांगलादेशला हा न्याय का नाकारला गेला? या 'भेदभावाचा' निषेध म्हणून पाकिस्तानने १५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे.
आयसीसीवर काय परिणाम होणार?
१. भारताला 'वॉकओव्हर' : क्रिकेट नियमांनुसार, पाकिस्तान मैदानात न उतरल्यास भारताला थेट 'वॉकओव्हर' दिला जाईल आणि सामन्याचे गुण भारताच्या खात्यात जमा होतील.
२. कोट्यवधींचे नुकसान: भारत-पाकिस्तान सामना हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठी कमाई करून देणारा सामना असतो. हा सामना रद्द झाल्यामुळे ब्रॉडकास्टर्स आणि जाहिरातदारांना प्रचंड आर्थिक फटका बसणार आहे.
३. पीसीबीवर कारवाईची टांगती तलवार: आयसीसी या बेशिस्त वागणुकीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) कोट्यवधींचा दंड किंवा निलंबनाची कारवाई करण्याची दाट शक्यता आहे.
आयसीसीकडून प्रेस नोट जारी..
आयसीसीने पाकिस्तानच्या 'निवडक सहभागा'च्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, असा पवित्रा जागतिक क्रीडा स्पर्धेच्या मूलभूत तत्त्वांच्या आणि निष्पक्षतेच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तान सरकारचा निर्णय खेळाच्या अखंडतेला आणि पावित्र्याला बाधा आणणारा असून, यामुळे केवळ जागतिक क्रिकेटचेच नव्हे तर पाकिस्तानमधील लाखो चाहत्यांचेही नुकसान होईल, असे आयसीसीने म्हटले आहे. पीसीबीने या निर्णयाचे त्यांच्या देशातील क्रिकेटवर होणारे गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊन सर्व भागधारकांच्या हिताचा मार्ग शोधावा, असा इशाराही आयसीसीने दिला असून विश्वचषक यशस्वी करणे ही सर्व सदस्यांची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले आहे.
१. आयसीसी काय कारवाई करू शकते?
- प्रचंड दंड: ब्रॉडकास्टर्सना होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी आयसीसी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) ५० ते १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावू शकते.
- निलंबनाची भीती: जर पाकिस्तानने आपला हट्ट सोडला नाही, तर भविष्यातील आयसीसी स्पर्धांमधून त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव काही सदस्य देशांनी मांडला आहे.
- यजमानपदावर गदा: आगामी काळात पाकिस्तानला मिळणाऱ्या स्पर्धांच्या यजमानपदावरही यामुळे संकट येऊ शकते.












Click it and Unblock the Notifications